वेल्हे -स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड (ता. वेल्हे) किल्ल्यावर याच महिन्यात राजगडावर दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी मधमाशांच्या हल्ल्यात खोल दरीत पडून एका ट्रेकरचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना राजगड किल्ल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने विकास बिरूदेव गावडे (वय 32) या ट्रेकरचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
राजगडावरील बाल्ले किल्ल्यावर वाळवा तालुका इंजिनियर असोसिएशनचे 32 जण गुरुवारी (दि. 16) ट्रेकिंगला गेले होते. भरदुपारी उन्हाच्या तडाख्यात गड चढून विकास गावडेसह 31 जण किल्ल्यावर पोहचले. दुपारी साधारण पावणेएकच्या सुमारास विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या साथीदारांना काही कळेना विकासला नेमके काय होत आहे. जवळपास औषध उपचाराचे काहीच साधन नव्हते. हृदयविकाराचा झटका तीव्र होता.
उपचाराअभावी विकास गावडे जास्त वेळ दम धरू शकले नाही. घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, मंडल अधिकारी खळदकर तसेच महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मिळताच डॉक्टरांसह घटनास्थळी धाव घेतली; परंतु खूप वेळ झाल्याने विकास गावडेला वाचवणे शक्य झाले नाही.
पुरातत्व विभाग या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे. पुरातत्व विभागाने या ठिकाणी प्राथमिक उपचाराची सुविधा करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आग्या मोहळाच्या मधमाशा आहेत, त्या ठिकाणी जाण्यास मनाई करणे. अवघड खोल दरी असतील त्या ठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे.
-संतोष साळेकर, अध्यक्ष शिवशाही संघटना वेल्हे