प्रभात वृत्तसेवा रावेत – भूमकर चौक येथील पदपथांवर झाडांची अनियंत्रित वाढ झाली आहे. तसेच वाढता कचरा नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. झाडांच्या फांद्या खाली आलेल्या असून काही ठिकाणी पदपथ पूर्णपणे झाकला गेला आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.भूमकर चौकात काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्तीही वाढली आहे. नागरिकांनी याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या तरी काही ठोस कारवाई झाली नसल्याची भावना व्यक्त होत आहे. “पदपथ हे चालण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नव्हे,” असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी प्रशासनाला वेळेत जागे करून झाडांची छाटणी आणि नियमित सफाईची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.