नगर -अलिकडे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश, या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यावर प्रभावीपणे मात करायची आहे. त्यासाठी काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन व अहमदनगर पोलीस दल यांच्यातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, उपअधीक्षक अजित पाटील, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक डि. एम. हाटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, अभिजीत ढाकणे, आकाश निऱ्हाळी, अनिकेत येमूल आदी उपस्थित होते.
स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांनी प्रास्तविक केले. वनसंपदेवर मानवाची बरीचशी कामे अवलंबून आहेत. त्यासाठी वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.