सोलापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत सोलापूरचा दौरा केला. यात त्यांनी येथील करोना नियंत्रणाच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपण सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने हा दौरा करत असल्याचे सांगितले. तसेच सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, करोना नियंत्रणासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आरोग्यमंत्र्यांना अधिक मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शरद पवार म्हणाले, सोलापूर हे संकटावर मात करणारं शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी एक अशीच वेळ आली जेव्हा प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही प्लेगवर मात करणाऱ्या ठिकाणांमध्ये सोलापूरचा समावेश होता. सोलापूरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांना माहिती नसेल. स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचं राज्य असताना अगदी मर्यादित काळासाठी ब्रिटिशांची सत्ता घालवण्यात एकच शहर यशस्वी झाले होते ते म्हणजे सोलापूर.
हुताम्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या या सोलापूरने स्वातंत्र्यासाठी हौताम्य दिले. त्यामुळे ब्रिटिशांना हरवणाऱ्या या शहराला करोनावर मात करणे फार अवघड नाही. त्यासाठी सोलापूरने एक मार्ग दाखवला तर तो संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी उपयोगी ठरेल.
राम मंदिर बांधून करोना जाणार काय?
देशभरात सर्वत्र करोना महामारीचे सावट आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला प्राधान्य देत आहेत. करोनामध्ये सापडलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे हा महत्वाचा प्रश्न सध्या उभा ठाकला असून या कामालाच आपण प्राधान्य देणे गरजेचे आहे, असा टोला पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. आमच्या दृष्टीने आम्हाला करोनाचे संकट महत्वाचे वाटते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे. छोटे-मोठे व्यवसायांचे नुकसान होत असल्याने आम्हाला चिंता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष घालावे, असा आमचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासन चांगलं काम करत आहेत. पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचेही या कामात अधिक लक्ष आहे. त्यामुळे आज त्यांना केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अनेक गोष्टींमध्ये अधिक मदत करणे गरजेचं आहे. रुग्णालयांमध्ये साधनांची गरज आहे. त्याची उपलब्धता करुन दिली पाहिजे. अधिक कर्मचारी हवे आहेत ते भरती केले पाहिजे. महापौरांनी नगरपालिकेच्या आरोग्य सुविधांमध्ये काही कमतरता असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सरकारने काही अनुदान देऊन मदत केली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
आम्ही या सर्व गोष्टींची नोंद केली आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्ही तिघेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊ. त्या दोघांच्या कानावर या गोष्टी घालू आणि या सर्व कमतरता दूर करु. यातून येथे यंत्रणांचं करोनावर नियंत्रण करण्याचं जे काही काम सुरु आहे त्याला हातभार लावू, असेही शरद पवार यांनी नमूद केले.