आर्थिक तंगीला तोंड देणारा पाकिस्तान नागरिकांना वीजसेवा देण्यात असमर्थ ठरतोय. पाकिस्तानात शनिवारी रात्री ११ वाजून ४१ मिनिटाला पॉवर ट्रान्समिशनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानची वीज खंडित झाली. त्यानंतर सुमारे २१ कोटी लोक दोन तास अंधारात होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे खापर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी भारतावर फोडले आहे.
पाकिस्तानची वीज भारताने कापली होती. दिल्लीजवळील शेतकरी आंदोलनापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी ही कृती भारताने केल्याचा शोध रशीद यांनी लावला. माहिती मंत्री शिबली फराज यांनी या समस्येसाठी जुन्या ट्रान्समिशन व्यवस्थेला दोषी ठरवले. ऊर्जामंत्री म्हणाले, २०१३-१८ दरम्यान पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज सरकारच्या काळातही असेच ब्लॅकआऊट झाले. या सगळ्या गोंधळामुळे नागरिकही अकारण धास्तावले. भारताने हवाई हल्ला केल्याने ब्लॅकआऊट केले असावे, असा नागरिकांचा समज झाला.
वीजपुरवठा खंडित झाल्यावर ऊर्जामंत्री म्हणाले, सिंध प्रांतातील गुड्डू पॉवर प्लँटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ब्लॅकआऊट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरवठा बंद झाला तेव्हा १०३२० मेगावॅट वीज ग्रीडमध्ये दिसून आली होती. एवढी वीज थंडीच्या दिवसांत संपूर्ण देशात पुरेशी आहे. रविवारी सकाळपर्यंत अंशत: वीजपुरवठा सुरू झाला होता.