Unseasonal Rains: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात त्याचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात आज अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या एका तासात झालेल्या मुसळधार सरींमुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि काही ठिकाणी रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पावसामुळे शहरातील पायाभूत सुविधांचीही पोलखोल झाली. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. कुडजे गावात गारपीट झाल्याची नोंद असून शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यांत जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, कांदा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पन्हाळगड परिसरात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारांचा मारा झाला. त्यामुळे शेतीसह दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.