Top 10 News: १. नाशिकमधील दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळू ९ जणांचा मृत्यू नाशिकमधील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरीतील शिवाजीनगर भागात असलेल्या एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब आपल्या इर्टिका कारने आले होते. कार्यक्रम संपवून रात्री १० च्या सुमारास हे कुटुंब घराकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, मंगल कार्यालयापासून काही अंतरावरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याशेजारील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही मोटार बाहेर काढण्यात आली. २. ‘स्वतःची निवडणूक गंभीरतेने घेतली असती, तर बरे झाले असते’ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीत काँग्रेसचा उमेदवार देणार आणि विजय मिळवणार, असा ठाम दावा करत निवडणुकीत एंट्रीची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेला भाजपचे नेते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर थेट निशाणा साधला आहे. थोरातांनी राहुरीची निवडणूक गंभीरपणे घेतली, यात हरकत नाही; पण त्यांनी स्वतःची निवडणूक तेवढ्याच गंभीरतेने घेतली असती, तर बरे झाले असते, असा टोला विखे यांनी लगावला. दुसरीकडे शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या असल्याच्याही चर्चा आहेत. तर भाजपकडून राहुरी पोटनिवडणूकीसाठी अक्षय शिवाजीराव कार्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Nashik accident ३. अखेर तोडगा निघाला! शिवरायांच्या पुतळ्याचे स्थलांतर होणार सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक पुतळा आणून बसवल्याने वाद निर्माण झाला होता. त्यासाठी जनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. या सगळ्यामुळे गावात आणि तालुक्यात तणाव निर्माण झाला होता. धनगर समाजाकडून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर शुक्रवारी रात्री यशस्वी तोडगा निघाल्यानंतर खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांनी आंदोलन मागे घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थी बैठक यशस्वी ठरली गेली. त्यामुळे आता या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधतील. ४. महसूल विभागात ३५ हजार पदांची महाभरती तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध सरकारने मान्य केला असून याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभाग सुधारित आकृतिबंध मंजूर करत एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील मोठ्या प्रशासकीय बदलांची घोषणा केली. याआधी महसूल विभागाचा शेवटचा आकृतिबंध 2006 मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नव्या आकृतिबंधासाठी अनेक आंदोलने केली होती. अखेर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार आता प्रशासकीय सुलभतेसाठी ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये, ८ नवीन उपविभागीय कार्यालये आणि ६९ अपर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे. ५. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर भागात हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युडीएफ उमेदवार ए. पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी शशी थरूर जात होते. Shashi tharoor convoy attacked in kerala अचानक काही अज्ञातांनी शशी थरूर यांचा ताफा अडवला. यादरम्यान, बंदूकधारी सुरक्षा कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केला. परंतु, हल्लेखोरांनी त्या सुरक्षा रक्षकालाच धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याची आता चौकशी सुरू आहे. ६. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ इराणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींनी मोठी उसळण मारल्याचं दिसून आलं. गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, 4 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 196 रुपयांनी वाढून 15,093 रुपये झाला आहे, तर 10 ग्रॅमचा भाव 1,50,930 रुपये इतका आहे. यामुळे आता सोन्याने गुंतवणूकदारांना दिलासा दिला असून, बाजारात पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ग्राहकांच्या खिशावरील भार आता वाढणार आहे. ७. पाकिस्तानला आणखी धक्का; सुरू होणार ‘मोहरा प्रकल्प’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. त्यानंतर आता पाकिस्तानला भारताने आणखी एक धक्का दिला आहे. तब्बल १२० वर्ष जुना ऐतिहासिक मोहरा जलविद्युत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची योजना जम्मू-कश्मीर सरकारने आखली आहे. हा प्रकल्प १९९० पासून बंद आहे. या प्रकल्पातून अनेक वर्षे श्रीनगर, काश्मीर खोरे आणि आसपासच्या भागांना वीज पुरवठा केला जात होता. मात्र १९९२ मध्ये आलेल्या भूकंपामुळे या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर हा प्रकल्प हळूहळू बंद पडला. मात्र आता जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी याप्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जम्मू-कश्मीर स्टेट पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बोर्डाने लिमिटेड टेंडर काढण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची क्षमता ५ मेगावॅटवरून १०.५ मेगावॅट करण्याची योजना आहे. ८. ट्रम्प यांचा ‘टेरिफ’ तडाखा! औषधांवर १००% आयात शुल्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा टेरिफ लागू करत जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा हादरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या रिशोरिंग धोरणांतर्गत परदेशी उत्पादनांवर, विशेषतः औषधांवर १०० टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेची औषधांसाठी असलेली परकीयांवरील निर्भरता संपवायची आहे. नवीन आदेशानुसार, जे देश अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार करणार नाहीत किंवा ज्या कंपन्या अमेरिकेत आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करणार नाहीत, त्यांच्यावर १०० टक्के टेरिफ लादले जाईल. याचा अर्थ असा की, जर एखादे भारतीय औषध अमेरिकेत १० डॉलरला मिळत असेल, तर आता त्याची किंमत थेट २० डॉलर होईल. पंजाब किंग्सचा सीएसकेवर ५ विकेट्सनी विजय ९. पंजाबने मारली बाजी! श्रेयसच्या संघाचा सलग दुसरा विजय आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने आपला दबदबा निर्माण केला आहे. शुक्रवारी झालेल्या लढतीत पंजाब ने यजमान सीएसकेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात ५ विकेट्सनी धूळ चारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पंजाबने १८.४ षटकांत ५ गडी गमावून विजय मिळवला. यासह पंजाब किंग्सने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पहिल्या सामन्यात पंजाबने गुजरात टायटन्सवर मात केली होती. ज्यामुळे आता त्यांना नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. १०. प्रतिक्षा संपली! ‘देऊळ बंद २’ची रिलीज डेट जाहीर २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या यशानंतर लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘देऊळ बंद २’ची घोषणा केली होती. अखेर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद २’ चे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. त्यानुसार, २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या चित्रपटात कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्तात आहे. हेही वाचा: Rashmika Mandanna: जागतिक रंगमंचावर रश्मिका मंदाना! टोकियोतील एनीमे अवॉर्ड्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व