Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाती मृत्यूबाबत नवे वादळ उठले असून, त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अपघात नसून नियोजनबद्ध कट तर नाही ना, याची देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी सांगितले की अजित पवारांचा प्रवास कारने करण्याचा आधीचा प्लॅन होता. मात्र आदल्या रात्री काही कारणांमुळे त्यांचा वेळ मुंबईत जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बदल जाणीवपूर्वक करण्यात आला का, याची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले. तसेच ऐनवेळी विमानाचे दोन्ही पायलट का बदलण्यात आले, विमानाच्या मेंटेनन्सचे प्रमाणपत्र कुणी दिले आणि त्याचा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. अपघाताच्या वेळी पायलटने ‘मेडे कॉल’ का दिला नाही, विमानाचा ट्रान्सपाँडर बंद का होता, स्टॉल वॉर्निंग आणि EGPWS सारख्या सुरक्षा प्रणाली कार्यरत होत्या का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. रोहित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी भारतातील संस्थांसोबतच फ्रान्स किंवा अमेरिकेतील तज्ज्ञ तपास संस्थांकडून व्हावी, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी इस्त्रायलच्या गुप्तचर संस्था ‘मोसाद’वर आधारित एका पुस्तकाचा दाखला देत, एखाद्या नेत्याचा घातपात करायचा असल्यास अप्रत्यक्ष मार्ग वापरले जातात, असे उदाहरण दिले. अजित पवारांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला का, याचा तपास व्हावा, असे ते म्हणाले. पुरावे नष्ट होण्याची शक्यता अपघाताचा घटनाक्रम सांगताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार सकाळी 7.50 वाजता विमानतळावर पोहोचले, 8.10 वाजता विमानाने उड्डाण केले आणि 8.43 ते 8.45 दरम्यान लोणावळ्याजवळ अपघात झाला. हे 16 वर्षे जुने लेअरजेट विमान VSR कंपनीचे होते. कंपनीच्या कार्यपद्धती, मेंटेनन्स, पायलटांवर असलेला ताण आणि इंधन बचतीसाठी घेतले जाणारे निर्णय यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. आतापर्यंत 13–14 दिवसांत कोणतीही ठोस चौकशी दिसत नाही. पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. व्हीएसआर कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली.