NCP women president : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधाला वेग आला आहे. रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता सक्षम आणि संघटनक्षम नेतृत्व निवडण्याचे मोठे आव्हान आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर अडचणीत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आता महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायउतार झाल्या. त्यामुळे या पदासाठी नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पदासाठी सध्या अनेक महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात सना मलिक यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. त्या आमदार असून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा म्हणून त्यांना प्राधान्य मिळू शकते. मात्र त्यांच्या निवडीला विरोधकांकडून राजकीय विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय सरोज अहिरे यांचेही नाव चर्चेत आहे. देवळालीच्या आमदार असलेल्या अहिरे यांचा उत्तर महाराष्ट्रात प्रभाव आहे. मात्र, पक्षातील मोठ्या जबाबदाऱ्या आणि संघटन कौशल्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वैशाली नागवडे यांना देखील अनुभवी आणि अभ्यासू नेत्या म्हणून पाहिले जाते. महानंदा संघटनेच्या अध्यक्षपदाचा त्यांना अनुभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्या सक्रिय राजकारणात काहीशा मागे पडल्याची चर्चा आहे, जी त्यांच्या निवडीसमोर अडथळा ठरू शकते. पुण्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या राजलक्ष्मी भोसले यांचे नावही जोरात आहे. त्या पुणे महापालिकेच्या माजी महापौर असून सध्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. अलीकडील निवडणुकांमध्ये त्यांचा ‘स्टार प्रचारक’ म्हणून समावेश होता. संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, तसेच इतर काही महिला नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र अंतिम निर्णय सुनेत्रा पवार आणि पक्ष नेतृत्वाकडूनच घेतला जाणार आहे. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेससाठी महिला प्रदेशाध्यक्ष पदाची निवड ही केवळ संघटनात्मक बदल नसून आगामी राजकीय रणनीतीचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. योग्य नेतृत्वाची निवड पक्षाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.