Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, राज्यभरात भाजपने अनेक ठिकाणी एकहाती सत्ता मिळवली आहे. मुंबई महानगरपालिकेवर सर्वांचे लक्ष लागले होते, जिथे ठाकरे गटाला २५ वर्षांचा गड गमवावा लागला आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने सत्ता काबीज केली. इतर अनेक महापालिकांमध्येही ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकामध्येही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला एकही जागा मिळाली नाही. एकूण ८१ जागांपैकी भाजपने तब्बल ४२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर काँग्रेसने ३८ जागांवर विजय मिळवला आहे. उर्वरित जागा अपक्ष किंवा इतर लहान पक्षांकडे गेल्या आहेत. ठाकरे गटाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून शहर प्रमुखांचा राजीनामा कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या अपयशानंतर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी तात्काळ राजीनामा दिला आहे. त्यांनी ओपन लेटरच्या माध्यमातून आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांना सादर केला असून, त्यात निवडणुकीतील पराभवाची संपूर्ण राजकीय आणि नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. सुनील मोदी यांनी पत्रात काय लिहिले? “मा. उद्धवजी ठाकरे साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र… कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारून, मी कोल्हापूर शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसला. वारंवार वरिष्ठांना याची कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही. तरीही पक्षाची प्रतिमा, युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला. विशेषतः काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, ते उल्लेखनीय असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा, राजकीय जबाबदारी स्विकारून निर्णय घेणे हे शिवसेनेच्या संस्कृतीला साजेसे आहे, या भावनेतूनच हा राजीनामा देत आहे. मात्र याचा अर्थ पक्षाशी निष्ठा कमी होणे असा नसून, यापुढेही मी मातोश्रीशी एकनिष्ठ राहून, कोणतेही पद न स्वीकारता, एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत राहीन. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, ही नम्र विनंती. आपला निष्ठावंत, सुनील मोदी” राज्यातील इतर महापालिकांच्या निकालांसोबतच कोल्हापूरचा हा निकाल आणि त्यानंतरचा राजीनामा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.