अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; ब्लॉक अध्यक्षांसह 12 नगरसेवक भाजपच्या वाटेवर अंबरनाथ नगरपालिकेत भाजपसोबत छुपी युती केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसने ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे निलंबन केले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात आली असून ब्लॉक कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आलीय. दुसरीकडे, प्रदीप पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले असून, ‘ब्लॉक अध्यक्षपदासाठी १ कोटींची मागणी करण्यात आली होती’ असा खळबळजनक दावा केलाय. काँग्रेसच्या या कारवाईनंतर राजकीय समीकरणे बदलली असून, पाटील आपल्या १२ नगरसेवकांसह लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. फडणवीसांकडून लातुरात ‘डॅमेज कंट्रोल’ ; विलासराव देशमुखांचा सन्मान आमच्या मनात कायम भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. “राजकीय मतभेद असले, तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासरावांचे योगदान मोठे असून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी लातुरात डॅमेज कंट्रोल केले. चव्हाण यांचे वक्तव्य अनावधानाने आले असून त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. लातूरच्या पाणीप्रश्नावर भाष्य करताना त्यांनी २५९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा दाखला देत आगामी काळात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. चव्हाणांच्या विधानामुळे लातूर बंदची हाक देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे हे विधान महत्त्वाचे मानले जातेय. मुंबईत मराठी माणसासाठी ठाकरेच हवेत; राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंना पाठिंबा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दर्शवलाय. “मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, आमची त्यांना सहानुभूती आहे,” असे विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले, यावरून मुख्यमंत्र्यांचे मराठी प्रेम दिसून येते, असा टोला त्यांनी लगावला. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी धाराशिवमध्ये झालेल्या आंदोलनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी मुंबईत मात्र ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केलाय. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत असं राजू शेट्टी म्हणाले. राहुल गांधींकडून मोदींची इंदिरा गांधींशी तुलना; म्हणाले,- ‘फरक समजून घ्या सरजी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. “मोदी ट्रम्पसमोर शरणागती पत्करतात, तर इंदिरा गांधींनी अमेरिकेला झुकवले होते,” अशा शब्दांत राहुल यांनी टीका केली. ट्रम्प यांनी नुकताच दावा केला होता की, मोदींनी स्वतः त्यांना भेटण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी १९७१ च्या युद्धाचा दाखला देत सांगितले की, अमेरिकेचे सातवे आरमार आले असतानाही इंदिराजी डगमगल्या नव्हत्या. याउलट, मोदींवर दबाव टाकताच ते शरण जातात. भाजपने मात्र हा दावा फेटाळला असून काँग्रेसने यापूर्वी मोदी-ट्रम्प यांचा एक उपहासात्मक AI व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला होता. ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचाली; युरोपीय देशांचा तीव्र विरोध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेत दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ माजलीय. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड महत्त्वाचे असून, लष्करी बळासह सर्व पर्यायांचा विचार सुरू असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. या भूमिकेवर डेन्मार्कसह युरोपीय देशांनी तीव्र आक्षेप घेतलाय. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी इशारा दिला की, “NATO सदस्यावर लष्करी कारवाई केल्यास ही युती संपुष्टात येईल.” ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनीही अमेरिकेची भाषा अनादर करणारी असल्याचे म्हटलेय. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि खनिज संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिका ग्रीनलँडसाठी आग्रही आहे. दरम्यान, यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प अनेकदा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याबद्दल बोललेत. एका चार्जवर धावणार 400 किमी; सिंपल वन जेन-2 झाली लॉन्च इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील स्टार्टअप ‘सिंपल एनर्जी’ने आपली बहुप्रतीक्षित सिंपल वन जेन-२ स्कूटर भारतीय बाजारात दाखल केलीय. या नवीन आवृत्तीत कंपनीने ‘अल्ट्रा’ व्हेरिएंट सादर केले असून, एका पूर्ण चार्जवर ते ४०० किमी पर्यंत धावेल असा दावा करण्यात आलाय. या स्कूटरची सुरुवातीची किंमत १.४० लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ‘लाइफ-टाइम वॉरंटी’ जाहीर केलीय. सुधारित इंजिनमुळे ही स्कूटर आता ११५ किमी/तास या टॉप स्पीडने धावू शकते. यात ७-इंच टचस्क्रीन, हिल-होल्ड असिस्ट आणि ३५ लीटर बूट स्पेस यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आलीत. या स्कूटरची थेट स्पर्धा ओला S1 प्रो आणि एथर ४५०X शी असेल. सॅमसंग गॅलेक्सी S25 आणि S24 अल्ट्राच्या किमतीत मोठी कपात; नवीन सिरीजच्या लाँचपूर्वी ग्राहकांना सुवर्णसंधी सॅमसंग आपली बहुप्रतीक्षित ‘Galaxy S26’ सिरीज २५ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक स्तरावर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या प्रीमियम फ्लॅगशिप मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात करून ग्राहकांना सुखद धक्का दिलाय. सध्या अॅमेझॉनवर Galaxy S25 Ultra वर तब्बल २३,७०९ रुपयांची थेट सूट मिळत असून, बँक ऑफर्ससह हा फोन साधारण १,०३,०८३ रुपयांपर्यंत खरेदी करता येतो. दुसरीकडे, फ्लिपकार्टने Galaxy S24 Ultra वर अधिक सवलत दिलीय. १,२९,९९९ रुपयांचा हा फोन आता ९७,९९० रुपयांत उपलब्ध असून, अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याची प्रभावी किंमत ९३,९९० रुपयांपर्यंत खाली येते. दोन्ही फोन्समध्ये २०० मेगापिक्सेलचा शक्तिशाली कॅमेरा आणि ५००० mAh ची बॅटरी आहे. सॅमसंगच्या आगामी फोनच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी असून, यामुळे प्रीमियम सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र झालीय. PF खात्यातून लग्नासाठी 100% रक्कम काढता येणार; ईपीएफओचा मोठा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खातेधारकांसाठी लग्नानिमित्त पैसे काढण्याच्या नियमांत महत्त्वपूर्ण बदल केलेत. आता खातेदार स्वतःच्या, मुलांच्या किंवा भावंडांच्या लग्नासाठी खात्यातील एकूण रकमेपैकी १००% पर्यंत रक्कम काढू शकतात. मात्र, खाते सक्रिय राहण्यासाठी किमान २५% शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी लग्नासाठी केवळ ३ वेळा पैसे काढण्याची मर्यादा होती, ती आता वाढवून ५ वेळा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी लागणारी किमान सेवा अट ५ वर्षांवरून कमी करून आता केवळ १२ महिने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता लग्नपत्रिका किंवा प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्यात आली असून, केवळ डिक्लरेशन फॉर्मद्वारे जलद गतीने पैसे मिळतील. या निर्णयामुळे ऐन लग्नसराईत कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; सहा दिवसांत कमावले ४.९६ कोटी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा बहुचर्चित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवतोय. १ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली असून, सहा दिवसांत एकूण ४ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रभावी कलेक्शन केलेय. पहिल्या वीकेंडला ३.९१ कोटींची कमाई केल्यानंतर, सोमवारी ५२ लाख आणि सहाव्या दिवशी मंगळवारी ५२.६ लाख रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला. मराठी शाळांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या कथानकामुळे प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळत आहेत. सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लावलेत. सचिनच्या घरी वाजणार सनई-चौघडे; मार्चमध्ये रंगणार अर्जुन-सानियाचा विवाहसोहळा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अर्जुन आणि त्याची मंगेतर सानिया चंडोक ५ मार्च २०२६ रोजी मुंबईत लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त आहे. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून ती स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या जोडीचा खाजगी स्वरूपात साखरपुडा झाला होता, ज्याला आता सचिन तेंडुलकर यांनीही दुजोरा दिलाय. ३ मार्चपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होईल. आयपीएल २०२६ मध्ये अर्जुन ‘लखनऊ सुपर जायंट्स’कडून खेळताना दिसणार असून, त्यापूर्वीच तो आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू करतोय. हा सोहळा अत्यंत खाजगी आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.