राज्यात २९ महापालिकांसाठी उत्साहात मतदान; अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या घटना राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज झालेल्या मतदानात १५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालेय. उद्या, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साहासह तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. मुंबईत बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या घटनांमुळे खळबळ उडाली, तर पैसे वाटपाचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नागपुरात काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयाला आग लागली, तर धुळ्यात ईव्हीएमची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नाशिक, जळगाव आणि चंद्रपूरमध्येही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मुंबईत ४१% तर पुण्यात ३६.९५% मतदान झाले. आता सर्वांचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागलेय. मुंबई मनपा एक्झिट पोल, ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग? भाजप-शिंदे युतीला बहुमताचा अंदाज मुंबई महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जनमतचा खळबळजनक एक्झिट पोल समोर आला आहे. या अंदाजानुसार, गेल्या २५ वर्षांपासून मुंबईवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युतीला १३८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ ६२ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला २०, तर इतरांना ७ जागा मिळतील असा अंदाज आहे. ‘टाईम्स नाऊ’च्या पोलनुसारही महायुतीला सर्वाधिक ४२-४५% मते मिळतील, असे म्हटले आहे. जेव्हीसी च्या अंदाजानुसार महायुतीला १३८ जागा मिळतील, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागेल. अॅक्सिस एक्झिट पोलनेही महायुतीला १३१ ते १५१ जागा मिळतील असा कल दिलाय. ममता बॅनर्जींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी होणार कोलकाता येथील आय-पॅक कार्यालयावरील छापेमारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा दणका दिलाय. कोळसा घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी गेलेल्या EDच्या अधिकाऱ्यांवर बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला न्यायालयाने स्थगिती दिलीय. तपास यंत्रणेच्या कामात असा हस्तक्षेप झाल्यास देशात अराजकता निर्माण होईल, असे गंभीर निरीक्षण न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने नोंदवले. या प्रकरणी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. ८ जानेवारी रोजी झालेल्या छापेमारी दरम्यान ममता बॅनर्जी यांनी कथितरीत्या हस्तक्षेप करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप ईडीने केला होता. न्यायालयाने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्य यंत्रणांचा वापर करून केंद्रीय संस्थांच्या तपासात अडथळा आणणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेय. अमेरिकेने इराणकडे वळवला युद्धनौकांचा ताफा; निदर्शकांच्या मृत्यूमध्ये मोठी वाढ ईराणमधील वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पाऊल उचलले असून मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटलेत. महागाईमुळे ईराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी आता उग्र रूप धारण केले असून सुरक्षा दलांच्या कारवाईत साडेतीन हजार लोकांचा मृत्यू झालाय. या हिंसेचा निषेध करत अमेरिकेने ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ हा अण्वस्त्रसज्ज युद्धनौकांचा ताफा ईराणच्या दिशेने रवाना केलाय. या ताफ्यात विनाशिका आणि अणु पाणबुड्यांचाही समावेश आहे. या सैन्य हालचालीमुळे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे सरकार धोक्यात आले असून, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत भीतीचे वातावरण पसरलेय. इराणधील निदर्शकांचे मृत्यू वाढल्यास कठोर कारवाईचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही इराणमध्ये असलेल्या आपल्या 10 हजारहून अधिक नागरिकांना त्या देशातून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्यात. सॅमसंगचा ‘गॅलेक्सी S26 अल्ट्रा’ लवकरच येणार; २०० मेगापिक्सेलचा जबरदस्त कॅमेरा सॅमसंग कंपनी आपली नवीन ‘गॅलेक्सी S26’ सिरीज पुढच्या महिन्यात लाँच करण्याची तयारी करत आहे. यामध्ये ‘गॅलेक्सी S26 अल्ट्रा’ हा सर्वात खास फोन असेल. या फोनमध्ये ६.९ इंचाची मोठी आणि अतिशय ब्राइट स्क्रीन देण्यात आलीय. कामाचा वेग वाढवण्यासाठी यात अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि १६ GB रॅम असेल, ज्यामुळे गेमिंग किंवा मल्टिटास्किंग करताना फोन अजिबात हँग होणार नाही. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा जबरदस्त मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. तसेच यावेळी चार्जिंगचा वेग वाढवून तो ६० वॅट करण्यात आलाय, ज्यामुळे फोन लवकर चार्ज होईल. हा फोन २५ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता असून मार्च महिन्यापासून तो विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. भारतात या फोनची किंमत साधारण १,२९,९९९ रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. टाटा पंच फेसलिफ्ट की ह्युंदाई एक्स्टर? स्वस्त आणि किफायतशीर पर्यायाची अशी करा निवड भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंच फेसलिफ्ट आणि ह्युंदाई एक्स्टर यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळतेय. एक्स शोरूम किमतीचा विचार करता टाटा पंच फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत ५.५९ लाख रुपये असून एक्स्टरची किंमत ५.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. यामुळे बेस व्हेरिएंटमध्ये टाटा पंच ग्राहकांसाठी किंचित स्वस्त ठरते. मिड-रेंज व्हेरिएंटमध्ये देखील पंचचे दर ७ ते ७.३५ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत, तर एक्स्टरच्या समान व्हेरिएंटसाठी ७.५१ लाख रुपयांपर्यंत मोजावे लागतात. दोन्ही गाड्या पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध असून, पंचमध्ये आता नवीन टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्यायही देण्यात आलाय. तांत्रिक सोयीसुविधा आणि सुरक्षिततेचा विचार करता, बजेटमधील ग्राहकांसाठी टाटा पंच हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर येतोय. बजाजचे नवे ‘चेतक C25’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; 113 किमी रेंजसह आकर्षक लूक बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन ‘चेतक C25’ इलेक्ट्रिक स्कूटर ९१,३९९ रुपये एक्स-शोरूम या किफायतशीर किमतीत दाखल केलेय. निओ-मेट्रो डिझाइन आणि पूर्णपणे मेटॅलिक बॉडी असलेले हे सध्याचे एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर असून यात २५ लिटरची मोठी बूट स्पेस आणि आरामदायक सीट देण्यात आलीय. या स्कूटरमध्ये २.५ किलोवॅटची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर ११३ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करते. विशेष म्हणजे ७५० वॉटच्या चार्जरमुळे ही बॅटरी केवळ ४ तासांत पूर्ण चार्ज होते. यामध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि ‘हिल होल्ड असिस्ट’ यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये असून हे स्कूटर सहा आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेय. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; २ कोटींचे विमा कवच आणि बँकिंग सवलत ८ व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केलीय. वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी ‘कम्पोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज’ लाँच केले असून, याद्वारे बँकिंग आणि विम्याच्या एकात्मिक सुविधा मिळणार आहेत. या विशेष खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांना २ कोटी रुपयांचा एअर अॅक्सीडेंट कव्हर आणि १.५ कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा मिळणार आहे. तसेच, हे खाते ‘झिरो बॅलन्स’ असून गृह, वाहन आणि शैक्षणिक कर्जावर व्याजात सवलत व प्रोसेसिंग फीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय मोफत लॉकर सुविधा, अमर्याद व्यवहार आणि एअरपोर्ट लाउंज एक्सेस असे फायदेही मिळतील. गट अ, ब आणि क मधील सर्व कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे आपले खाते या पॅकेजमध्ये अपग्रेड करू शकतात. BMC निवडणूकीत सेलिब्रिटींचा उत्साह; अक्षय, हेमा मालिनींसह दिग्गजांनी बजावला हक्क मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील २९ नगरनिगमांसाठी गुरुवारी उत्साहात मतदान पार पडले. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने सर्वात आधी मतदान केंद्रावर पोहोचून आपला हक्क बजावला. त्याच्यापाठोपाठ हेमा मालिनी, सचिन तेंडुलकर, जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, गुलजार आणि सलीम खान यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी मतदान केले. “सुरक्षितता, प्रदूषणमुक्त हवा आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मतदान करणे ही प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे,” असे आवाहन हेमा मालिनी यांनी केले. तर “तक्रार करण्यापेक्षा मतदानातून बदल घडवा,” असा संदेश सुनील शेट्टी आणि जुनैद खान यांनी दिला. विवेक अग्निहोत्री आणि ट्विंकल खन्ना यांनीही शहर विकासासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. खेळाडूंच्या संपापुढे बांगलादेश बोर्ड झुकले; वादग्रस्त अधिकारी नजमुल यांची हकालपट्टी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वित्त समितीचे अध्यक्ष नझमुल इस्लाम यांची तातडीने पदावरून हकालपट्टी केलीय. माजी कर्णधार तमीम इक्बालला “भारतीय एजंट” म्हणणे आणि खेळाडूंच्या मानधनावर अपमानजनक भाष्य करणे नजमुल यांना महागात पडलेय. या विधानांमुळे संतापलेल्या खेळाडूंनी ‘बांगलादेश प्रीमियर लीग’वर बहिष्कार टाकला होता, ज्यामुळे ‘नोआखली एक्सप्रेस’ आणि ‘चटगाव रॉयल्स’मधील सामना रद्द करावा लागला. खेळाडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे बोर्डाने नमती भूमिका घेत नझमुल यांना घरचा रस्ता दाखवला. “खेळाडूंचे हित आणि सन्मान आमची प्राथमिकता आहे,” असे स्पष्ट करत बीसीबीने खेळाडूंना पुन्हा मैदानात उतरण्याचे आवाहन केलेय.