1. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस पुण्यात सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फाॅर्म देण्यात आले त्यामुळं भाजपसह सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. त्यातच बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून त्यांची मनधरणी सुरूय. गुरुवारी दिवसभरात पुण्यात एकूण ६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत, तर अजूनही शहरात १६५ जागांसाठी २५२३ उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात असून, आज अर्ज माघारी घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीनपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून हे काम सुरू असल्याने निश्चित माहिती समोर आली नाही. 2. भाजप-शिवसेना युतीचा तिढा कायम भाजप शिवसेनेला पुणे महापालिका निवडणुकीत केवळ १६ जागाच देण्यास तयार आहे. मात्र, शिवसेनेकडून १०० हून अधिक उमेदवारांना एबी फाॅर्म दिले असून, छाननीअंती जवळपास ८० जणांचे उमेदवारी अर्ज वैध झालेत. त्यामुळे युतीचा फाॅर्म्युला ठरला आणि वाट्याला २० जागा आल्या, तरी राहिलेल्या ६० उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगताना शिवसैनिकांचा रोष कोण शिंदेसेना ओढवून घेणार? का असा सवाल निर्माण झालाय. भाजप- शिवसेना युतीतील जागावाटपाची बैठक गुरुवारी संध्याकाळी होणार होती. मात्र, ती बैठक झाली नसून,आज ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येतंय आणि त्यानंतर युतीचा निर्णय आणि जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरेल असंही म्हटलं जातंय. 3. नाराज उमेदवार ‘नॉट रिचेबल’ भाजपसह सर्वच राजकीय पक्षात महापालिका निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता थेट अधिकृत उमेदवारांना एबी फाॅर्म दिलेत. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून सोशल मीडियावर पक्षाच्या विरोधात जोरदार टिका सुरू केलीय. त्यामुळे, आता नाराजांना रोखण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असून काही ठिकाणी पक्षाचे नेते थेट उमेदवारांना संपर्क साधतायत. तर, अनेकांनी नेत्यांचे फोन चक्क ब्लाॅक केल्यानं या इच्छुकांना शोधण्यासाठी तिकिट मिळालेल्या उमेदवारांची कसरत सुरू असल्याचं दिसतंय. मात्र, त्यानंतरही बंडखोर ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता पक्षाचे नेते या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 4. दोन्ही राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार ? पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवित असून आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रितपणे पालिकेची निवडणूक लढवण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाने युती केली आहे. मात्र, अनेक जागांवर दोन्ही पक्षाकडून उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शिवसेना (शिंदे गट) या पक्षानेही युतीची वाट न पाहता अनेक जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांना एकत्रितपणे निवडणूक लढवायची असेल तर काही जागांवरील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजदुपारी तीन पर्यंतच मुदत आहे. त्यामुळे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार का, याचे चित्रही आजच होणार आहे. 5. एबी फॉर्म गिळणाऱ्या उद्धव कांबळेंवर कारवाई शिवसेनेच्या (शिंदे) पक्षाच्या एका उमेदवाराने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘एबी’ अर्ज गिळल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली.याप्रकरणी उद्धव लहू कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली.त्याच दिवशी हा अजब प्रकार घडलाय. 6. पिंपरी चिंचवडमध्ये ९९ उमेदवारांचे अर्ज बाद! पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेवारी अर्ज दाखल केले आहेत. शहरातील ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठी तब्बल १९९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांची छाननी पूर्ण झाली असून त्यामध्ये ९९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. आता १२८ जागांसाठी १८९४ उमेदवार रिंगणात आहेत. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यामुळे २ जानेवारी रोजी सायंकाळी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. 7. नवऱ्याने बंडखोरी केली, बायकोनं थेट घरच सोडलं महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काहींना बंडखोरी करावी लागली. मात्र आता या बंडोबाना थंड करण्याचे काम राजकीय पातळीवर केले जात आहे. सध्या राज्यातील सुरू असलेलल्या या नाट्यमय बंडखोरीमध्ये नागपूरमधील बंडखोरीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. नवऱ्याने पक्षात बंडखोरी केल्याने बायको नाराज होऊन थेट माहेरी निघून गेली आहे. भाजपमधील बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरीच पाहायला मिळाला आहे. भाजपने प्रभाग 17 मधून मनोज साबळे यांना उमेदवारी दिली आहे. मनोज साबळे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. तिकीट कापल्याने विनायक डेहनकर यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे अर्चना डेहनकर यांनी नवऱ्याचं घर सोडायचं ठरवून भावाच्या घरी गेल्या. 8. “राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावाने पाटी कोरी” केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर टीका केली. “आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना प्रत्यक्ष भेटतो, त्यांच्या सुख-दुःखात धावून जातो. त्यामुळेच मुंबईकरांच्या हृदयात आमचे स्थान अढळ आहे. केवळ गर्दी जमवून समस्या सुटत नाहीत. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही, आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही ? ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती,” असे म्हणत आठवलेंनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना टोला लगावला. 9. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू- उपेंद्र द्विवेदी गेल्या वर्षी पाकिस्तानने काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिले होते. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. नवीन वर्ष सुरू होताच, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय. त्यांनी देशाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या जलद कारवाईचे कौतुक केले. तसेच ही कारवाई अजूनही सुरू असल्याची महत्वपूर्ण माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलीय. तसेच त्यांनी भविष्यासाठी सैन्याला तयार करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा अवलंब करण्याचे आवाहनदेखील केलंय. 10. आता फ्रान्समध्येही मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी ? मुलांच्या सोशल मीडिया वापरावर जगभरात चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालून एक मोठं पाऊल उचललय.आता फ्रान्सदेखील याच पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, फ्रान्स यावर्षातच १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याची योजना आखणार असल्याचं म्हटलं जातंय. फ्रान्समधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मोबाईल फोनवर आधीच बंदी आहे आणि ही बंदी वाढवण्याची सरकारची योजना आहे.