Kishori Pednekar | राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहेत. 2 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 265 नगरपालिका, नगर परिषदांसाठी मतदान पार पडलं. तर 20 डिसेंबर रोजी उर्वरित 23 ठिकाणी मतदान पार पडलं. पहिल्यांदाच महायुतीतील तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढल्याचं दिसून आलं. या सर्वांच्या मतपेटया म्हणजे ईव्हीएम मशिन आज खुले होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून नगरपंचायत आणि नगरपरिषद निकालाचे कल येण्यास सुरुवात होणार आहे. तर दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निकालांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यामांसोबत बोलताना राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “महाराष्ट्रात सध्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच समीकरण सुरू आहे. आजचा निकाल जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा असेल. सत्ताधाऱ्यांनी वाटलेला पैसा त्यांच्या घरचा नसून तो जनतेचाच आहे, याचे भान मतदारांनी ठेवले पाहिजे. ज्यांनी पैशाला भुलून नाही तर विचार करून मतदान केले आहे, त्यांच्यामुळे आज निष्ठेचाच गुलाल उधळला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप करण्यात आले. मात्र एकही सिद्ध झाला नाही आणि ते दिल्लीश्वरांपुढे झुकले नाहीत. ही निवडणूक अशा व्यक्तीची प्रतिष्ठा वाचवण्याची आहे, ज्याने संकटात महाराष्ट्राला सांभाळले, असेही किशोर पेडणेकर म्हणाल्या. Kishori Pednekar | अनेक ठिकाणी आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत निवडणूक आयोग शुद्धीवर आहे का? असा थेट सवाल केला. मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ घालणे आणि निवडणुका जाणीवपूर्वक लांबणीवर टाकणे हे मतदारांना कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे. आज अनेक ठिकाणी आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. Kishori Pednekar | दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी निवडणुका चांगल्याच गाजल्या. कारण महायुतीतील तीनही पक्ष, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असल्याने नगरपालिका निवडणुकीच्या निकालांकडे महापालिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणून पाहिले जात आहे. हेही वाचा: Aditya Thackeray: बुलडोझरसमोर पहिला मी उभा राहीन! लोकमान्य नगरच्या रहिवाशांना आदित्य ठाकरेंचे शब्द