नागपूर: “राजकारणात नगरसेवक आणि महापौर होणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. मी गमतीने नेहमी म्हणतो की, ज्याने मागच्या जन्मी पाप केलं असेल तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केलं असेल तो महापौर होतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातील सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नागपूर येथे एका मुलाखतीत ते बोलत होते. पहाटे ४ ला झोपलो अन् ७ वाजता तक्रार आली- आपल्या नगरसेवक पदाच्या पहिल्याच दिवसाचा अनुभव सांगताना फडणवीस म्हणाले, “मी वयाच्या २१ व्या वर्षी नगरसेवक झालो. निवडीनंतर रात्री उशिरापर्यंत जल्लोष आणि मिरवणुका सुरू होत्या. थकल्यामुळे पहाटे ४ वाजता मी हॉलमध्येच झोपलो होतो. मात्र, सकाळी ७ वाजताच घराची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर एक गृहस्थ उभे होते. इतक्या सकाळी येण्याचे कारण विचारले असता त्यांनी ‘गटार चोक झाले आहे’ अशी तक्रार केली. आपण नक्की काय स्वीकारलं आहे, याची जाणीव मला त्याच क्षणी झाली.” तेव्हा दिवे लावण्याचे ‘दिव्य’ पार पाडावे लागायचे – बदलत्या काळावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वीच्या आणि आताच्या महापालिकेत मोठा फरक आहे. “आमच्या काळात नगरसेवकाला फक्त रस्ते, गटार आणि दिवे यांचाच विचार करावा लागायचा. तेव्हा पथदिवे लावण्यासाठी स्टोअर कीपरला पटवणं हे एक मोठं ‘दिव्य’ असायचं. मात्र, आज चित्र बदललं आहे. मी महापौर होतो तेव्हा नागपुरात फक्त ८ पाण्याच्या टाक्या होत्या, आज ती संख्या १०८ वर पोहोचली आहे. नागपूर आता एक आधुनिक शहर म्हणून ओळखले जात आहे.” निवडणूक पुढे ढकलली नसती तर… आपल्या उमेदवारीबाबत एक गुप्त गुपित उलगडताना फडणवीस म्हणाले, “जर तेव्हा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नसत्या, तर मी नगरसेवक होऊच शकलो नसतो. ज्यावेळी मला विशिष्ट वॉर्डमधून लढण्यास सांगण्यात आले, तेव्हा माझे निवडणूक लढवण्याचे वय पूर्ण झाले नव्हते. पण ही बाब मी कोणालाही सांगितली नाही. सुदैवाने काही कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि प्रत्यक्ष निवडणुकीवेळी माझे वय पूर्ण झाले.” या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. सध्या ते राज्यव्यापी दौऱ्यावर असून महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.