महापालिका निवडणूक प्रचाराचा आज समारोप महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना प्रचाराने कळस गाठलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मेळावे, झंझावाती रॅली आणि कोपरा सभांनी गाजलेला प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून ती प्रतिष्ठा, बंडखोरी आणि बदललेल्या युती-आघाडीच्या समीकरणांची कसोटी ठरणारी आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी म्हणजे १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. पुणे पालिकेतील १६३ नगरसेवक पदासाठी (दोन बिनविरोध) निवडणूक होत असून एकूण १ हजार १४९ उमेदवार रिंगणात आहे. महापालिका निवडणूक मतदानासाठी १२ हजारांवर पोलिस तैनात महापालिका निवडणूक मतदानाच्या रणसंग्रामासाठी पुणे पोलीस दल सज्ज झालंय. वरिष्ठ पोलीस अधिकारी ते पोलीस अंमलदार असा तब्बल १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आलाय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण तयारी केलीय. संवेदनशील मतदार केंद्रासह महत्त्वाच्या केंद्रावर बारकाईनं नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस अंमलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त आणि उपायुक्त अशा पद्धतीने बुथ केंद्रावरील चारस्तरीय सुरक्षितता तैनात केली जाणार आहे. वादविवादासह अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी पथक दक्ष आहेत. “मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे” – विश्वजीत कदम राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही. लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसत होते. काँग्रेस आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देत प्रभावी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला असून जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटलं. मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सुट्टी ! पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान दि.15 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचं महापालिका प्रशासनाने जाहीर केलंय. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था आदी पूर्वतयारी व मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या कामकाजासाठी पुणे महानगरपालिका हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, संस्था व इतर इमारती मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या इमारतींमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्या इमारतींमध्ये दिनांक १४ जानेवारी २०२६ आणि १५ जानेवारी २०२६ या कालावधीत निवडणूक विषयक कामकाजाव्यतिरिक्त इतर सर्व नियमित कामकाज बंद ठेवण्यात येणारेत. “बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपसोबत” – रामदास आठवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत,असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय.पुण्यातील प्रचारादरम्यान, त्यांनी आम्हाला करायची आहे दुश्मनांची माती, म्हणूनच पुण्यात सत्तेवर येणार आहे महायुती,असं मिश्कीलपणे म्हटलं. तसंच आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. महायुती ही आपलीच असून, प्रकाश आंबेडकर आणि मायावती हेही आपलेच आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेला जनादेश हा जनतेच्या विश्वासाचे ठोस प्रतीक असून, पुणे महापालिका निवडणुकीत लाखोंची भीमशक्ती भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. दबावाच्या राजकारणाला आता पूर्णविराम – शशिकांत शिंदे पिंपरी चिंचवड शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. येथील स्वच्छ रस्ते, राजीव गांधी आयटी पार्क असे अनेक कामे केली आहेत. त्याचबरोबर अनेक रिकाम्या हातांना रोजगार दिला. भाजपने सुसंस्कृत असल्याचे ढोंग करू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार ) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलीय. त्यांनी यावेळी बोलताना सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्यासारख्या वापरल्या जात आहेत. ठरवून विरोधकांवर दबाव टाकण्याचं राजकारण सुरू आहे. पण पिंपरी-चिंचवडची जनता हुशार आहे, ती हे सर्व ओळखते. ज्या पक्षानं शिस्तीचे धडे दिले, त्या पक्षातच आता शिस्त राहिलेली नाही. जर शिस्तच उरली नसेल, तर आरएसएसच्या प्रमुखांनी त्यांचे कान टोचावेत.असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला . मी काही अदानींचा वकील नाही पण… गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या याच प्रश्नाचे उत्तर मुख्यमनातरी देवेंद्र फडणवीस यांनी दिलय. याविषयी बोलताना त्यांनी, मी काही अदानींचा वकील नाही राज ठाकरेंच्या प्रश्नाचं उत्तर ते देतीलच पण २०१४ पासून एकच नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा विकास झाला, त्यांचे उत्पन्न कैकपटीनं वाढलंय असं म्हटलं. तसंच एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले.असंही त्यांनी म्हटलं. राज्यावर पावसाचं संकट ! राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहे. असे असले तरी उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. धुळे आणि निफाड येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता कायम असून, गारठा काहीसा कमी होणार असल्याचं सांगितलं. शिवाय पुढील दोन दिवस ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागानं म्हटलंय. पंतप्रधान कार्यालय त्यांचे पत्ता बदलणार मकर संक्रांतीच्या निमित्ताने, पंतप्रधान कार्यालय त्यांचे पत्ता बदलणार आहे. ७७ वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालय देशाला नवीन कार्यालयातून कारभार पहिला जाणारेय. पंतप्रधान कार्यालय दिल्लीच्या साउथ ब्लॉकमधून एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्हमध्ये स्थलांतरित होत आहे. ही केवळ एक इमारत नाही तर २०४७ मध्ये विकसित भारताचे प्रतिबिंब आहे. ते आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि सुरक्षा इतकी मजबूत आहे की त्यात प्रवेश करणे जवळजवळ अशक्य आहे.सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून बांधण्यात आलेले हे नवीन पीएमओ अंदाजे २,२६,००० चौरस फूट क्षेत्रफळाचं आहे. हे बांधण्यासाठी अंदाजे ₹१,१८९ कोटी खर्च आलाय. संपूर्ण संकुल जगातील सर्वात सुरक्षित इमारतींपैकी एक मानलं जातं. अमेरिकेकडून आता भारतावर ७५% कर आकारला जाणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केलीय. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिका कर वाढवेल. इराणवर आर्थिक दबाव वाढवण्याची रणनीती म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम भारत आणि चीनसह जगभरातील अनेक देशांवर होऊ शकतो. अमेरिकेने आधीच भारतावर ५० टक्क्यांपर्यंत कर लादला आहे. परिणामी, नवीन कर भारत-अमेरिका संबंधांना आणखी ताण देऊ शकतात.