Arvind Kejriwal – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणे आणि चौकशीला हजेरी न लावल्याच्या आरोपातून न्यायालयाने केजरीवालांची निर्दोष सुटका केली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याशी निगडीत चौकशीसाठी ईडीने केजरीवाल यांना सहा वेळा समन्स बजावले होते. केवळ चौकशीला उपस्थिती लावली नाही म्हणजे जाणीवपूर्वक अनादर केला, असे म्हणता येत नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आरोपातून निर्दोष मुक्त केले. अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत ‘सत्यमेव जयते’, अशी पोस्ट शेअर केली आहे. न्यायालयाकडून आप पक्षाचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनाही दिलासा मिळाला आहे. दिल्ली वक्फ बोर्डातील कथित बेकायदेशीर भरतीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अमानतुल्ला खान ईडीसमोर हजर राहण्यास अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांच्याविरोधात फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये दोन गुन्हे नोंद केले होते. भारतीय दंड संहिता कलम १७४ (सरकारी अधिका-याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन चौकशीला हजर न राहणे) या अंतर्गत केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.