काल शिंदे गटाच्या गळाला लागल्या, आज पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर मध्यरात्री ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्या आहेत. मुंबईतील प्रभाग 157 मधून डॉ. सरिता म्हस्के ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे गटाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र त्या नंतर नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. आता त्या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत, दरम्यान नेमकं काय घडलं होतं? याचं स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत. ठाकरेचे नगरसेवक मोठा निर्णय घेणार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून ठाकरेंचे सात नगरसेवक आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणताही सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करु असं मोठं वक्तव्य ठाकरेंचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केलं. याठिकाणी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती करून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले. परंतु, शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंचे चार नगरसेवक गळाला लावल्याने ठाकरेंकडे सात नगरसेवक शिल्लक राहिले. या सात नगरसेवकांनी त्यांच्या गटाची नोंदणी केली आणि उमेश बोरगावकरांना गटनेता म्हणून घोषित केलं.त्यांनीच याबाबत घोषणा केलीय. बारामती, दौंड तालुक्यात सगळ्या जागा अजितदादा लढवणार महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. शक्य त्या ठिकाणी घडाळ्याच्या चिन्हावर तर शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर लढण्यात येणार आहे. असं असलं तरी पुण्यातील बारामती आणि दौंडमध्ये मात्र शरद पवारांच्या गटाला एकही जागा सोडण्यात आली नाही. या दोन्ही तालुक्यात अजित पवारांचे उमेदवार लढणार आहेत. बारामतीमधून जिल्हा परिषदेच्या तीन तर पंचायत समितीच्या सहा जागा शरद पवारांच्या पक्षाने मागितल्या होत्या. मात्र त्यापैकी एकही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाला दिली नाही. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. पुण्यात काँग्रेस-वंचितची युती! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी अधिकृत आघाडी केली आहे. दोन्ही पक्षांची एकमेकांशी चर्चा करुन त्या-त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचाही निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या ७३ जागा व पंचायत समितीच्या १४६ जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार आहे. आघाडी करताना दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांशी चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवले आहेत. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी त्यास मान्यता दिली आहे. नामांकन पत्र दाखल केल्यानंतर या आघाडीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी आघाडी झाली असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा असलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश न करताच मोठी लॉटरी लागलीय. शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंतांच्या छातीवर अखेर कमळ लागलं असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पुत्र पृथ्वीराज सावंतांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला असला तरीही त्यांना ऐनवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे, तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का मानला जातो. लातूरमध्ये वडिलांना तिकीट नाकारल्याने पुत्राकडून संताप लातूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी येतीय. वडिलांना आगामी जिल्हा परिषदेचे तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आल्याने पक्षाचे कार्यकर्ते मधुकर एकुर्केकर यांच्या पुत्राने किळसवाणा प्रकार केल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजय बनसोडे यांच्या स्थानिक कार्यालयाबाहेर मधुकर एकुर्केकर यांनी पक्ष नेतृत्वाकडून आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत आपला निषेध नोंदवला. मात्र याचवेळी त्यांचे पुत्र नितीन एकुर्केकर यांनी बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघुशंका करून आपला राग व्यक्त केला. दरम्यान , त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरावरून तीव्र विरोध करण्यात येत आहे. तर उदगीरच्या निदेबन जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट मागणाऱ्या मधुकर एकुर्केकर यांच्या समर्थकांचा दावा आहे की वर्षानुवर्षे तळागाळात समर्पित काम करूनही पक्षाने त्यांना बाजूला केले आहे. राज्याच्या तापमानात किंचित वाढ राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झालाय. काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीने उकाडा जाणवत आहे. आज किमान तापमानात वाढ कायम राहून, अंशतः ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतोय. राज्यात काल पासून गारठा कमी झाला असून आज देखील किमान तापमानातील वाढ कायम आहे. शिवाय अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी राजस्थानच्या जैसलमेर महामार्गावरील मुलानाडा रॉयल्टी चेकपॉईंटजवळ ट्रक आणि बचसा हा अपघात मंगळवारी रात्री झाल्याचे समजतेय. देवदर्शनाहून येताना ४७ प्रवाशांनी भरलेली बस आणि टँकरची जोरात धडक झाली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की एका प्रवाशाचा पाय तुटलाय तर दोन प्रवाशांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटानस्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ‘ ‘आयोग बेलगाम घोड्यासारखे वागू शकत नाही…’ विशेष सघन पुनरावलोकन (SIR) च्या वैधतेवरील युक्तिवाद ऐकताना, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. न्यायालयाने कठोर शब्दात आयोग आपले अधिकार मनमानीपणे वापरू शकत नाही.असे सांगितले आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाला कायद्याच्या वर मानले पाहिजे का आणि ते नियमांचे पालन न करता निर्णय घेऊ शकते का ?असा खोचक प्रश्न उपस्थित केला. तसेच कोणत्याही संवैधानिक संस्थेला बेलगाम घोड्यासारखे वागण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असेही न्यायालयाने म्हटले. ‘ग्रीनलँड हा फक्त बर्फाचा तुकडा’- ट्रम्प स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक बैठकीदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी,अमेरिका ग्रीनलँडला जोडण्यासाठी बळाचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यासोबतच केवळ अमेरिकाच या खनिज समृद्ध बेटाचे रक्षण करू शकते.” असा दावा देखील त्यांनी केलाय. अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या केंद्रस्थानी ग्रीनलँडचा मुद्दा आहे.दरम्यान, या ग्रीनलँडच्या मुद्द्यावर कोणी नाही म्हटलं तर आम्ही ती गोष्ट कायम लक्षात ठेऊ असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिलाय.