Revanth Reddy – तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी बुधवारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर तीव्र टीका करताना, मागील बीआरएस सरकारच्या काळात पती-पत्नींमधील खासगी संभाषणांवरही फोन टॅपिंगद्वारे नजर ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. मिरयालागुडा येथे आयोजित सभेत बोलताना रेड्डी म्हणाले की, बीआरएस सरकारने दहा वर्षे सत्ता उपभोगून राज्याची लूट केली आणि कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली. संपत्ती कमावणे कदाचित सहन करता येईल, पण पती-पत्नींच्या संभाषणांवर कान ठेवणे हा अत्यंत अपमानजनक गुन्हा आहे, असे ते म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की न्यायाधीश, चित्रपट तारे, विरोधी पक्षनेते आणि पत्रकार यांनाही लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणात तेलंगणा पोलिसांच्या एसआयटीने १ फेब्रुवारी रोजी केसीआर यांची त्यांच्या निवासस्थानी पाच तास चौकशी केली होती. रेड्डी यांनी माजी मंत्री के.टी. रामाराव आणि हरीश राव यांच्यावरही टीका करत कठोर शब्दांत कारवाईची मागणी केली. केसीआर हे तेलंगणाचे जनक नव्हते, ते फक्त त्यांच्या पक्षापुरते महान होते, अशी टोलेबाजीही त्यांनी केली. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रेड्डी यांनी मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच निवडणुकांनंतर रयथु भरोसा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ९,००० कोटी रुपये जमा केले जातील, असे आश्वासनही दिले.