उद्याच्या सुनावणीवर निवडणुकांचे भवितव्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलीय. त्यात १५ जिल्ह्यांत सरपंच आरक्षणातही ५० टक्क्यांचा निकष पाळला गेला नसल्याची बाब समोर आलीय. तेलंगणातही ५० टक्क्यांची मर्यादा पार केल्याने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राबाबत कोणता निर्णय होतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. ================= बीडमध्ये आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला बीड नगरपालिका निवडणुकीत योगेश क्षीरसागर विरुद्ध आमदार विजयसिंह पंडित यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय. आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून योगेश क्षीरसागर यांच्यावर जहरी टीका केली. स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळकुटेपणा केला. ही माझी निवडणूक नाही. मात्र, माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही, अशा चिल्या पिल्याने माझ्यावर आरोप करू नये, असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. ==================== ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गटाला) मोठा धक्का बसलाय. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. या उमेदवारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलीय. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे. =================== पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेला अटक पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे यांनी वरळीतील घरात आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला.दरम्यान , या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यन , मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली असल्याची माहिती समोर आलीय. मात्र, या प्रकरणातील अजून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली की, नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही. तर दुसरीकडे या पकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं पकंजा मुंडे यांनी म्हटलंय ================== नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट नगरपालिका निवडणुका घोषित झाल्यानंतर उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठीनं उमेदवारी डावलल्यानं नाराज झालेल्या अनेकांनी राजीनामाअस्त्र उगारलंय. निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचलेली असतानाचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबित सिद्दिकी यांची भेट घेतली. आबिद सिद्दिकी यांच्या प्रकृतीची विचारणा करण्या साठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी, या भेटीमागं मोठी राजकीय उलथापालत होण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ================= ‘सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही’ भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय. ‘सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो’, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या एका पुस्तकाचा दाखला देत हे विधान केलं आहे. दरम्यान, ‘सिंध हा प्रदेश आज भारताचा भाग नसला तरी संस्कृतीनुसार तो नेहमीच भारताचा भाग राहील’, असं म्हणत लालकृष्ण आडवाणी यांच्या सारख्या नेत्यांनी सिंध प्रदेश भारतापासून वेगळं होणं हे कधीही स्वीकारलं नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ===================== सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज -मोदी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) सुधारणा करणे हा केवळ पर्याय उरला नसून ती आता एक गरज झाली आहे, असे ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांच्या (आयबीएसए) नेत्यांची परिषद झाली. त्या वेळी जागतिक संघटनांमध्ये बदलावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ब्राझीलचे आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष हे देखील या बैठकीत सहभागी झाले. यावेळी तिन्ही देशांदरम्यान सुरक्षाविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी ‘आयबीएसए’च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या स्तरावर बैठका सुरू करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी मांडला. ================= इस्त्रायलचा लेबनॉनवर एअर स्ट्राईक इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. कारण लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या दहियेमध्ये इस्रायलने मोठा एअर स्ट्राईक केलाय. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने दावा केलाय कि या हल्ल्यात हिजबुल्लाहचे चीफ ऑफ स्टाफ या हल्ल्यात ठार झाले. मात्र, हिजबुल्लाहने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. हा हल्ला इतका शक्तिशाली होता की स्फोटानंतर लोक इमारतींमधून बाहेर पडले, ज्यामुळे संपूर्ण परिसरातभीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यासोबतच या हल्ल्यात अनेक इमारतींचे आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय ==================== स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगलीत पार पडणार होता. मात्र स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, स्मृतीच्या वडिलांची तब्बेत बिघल्यानंतर आता पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडलीय. यानंतर पलाशला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर तो हॉटलेवर रवाना झाला. व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्यानं पलाशची तब्बेत बिघडल्याचं सांगण्यात येतंय. ===================== नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका-गौतमी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिचे कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तूफान गर्दी होते. मात्र काहीवेळेस गोंधळ होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते.अशीच परिस्थिती नुकतीच वर्ध्यातील कार्यक्रमात झाली. काही हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घातला होता. त्यावृ गौतमीवर टीकाही झाली. यावरच आता गौतमीने प्रतिक्रिया दिलीय. तिने आपल्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही कार्यक्रमाला कला बघायला येत असाल, तर तुम्ही प्लीज थोडसं शांततेत कार्यकर्म पूर्ण बघा. तुम्हाला गडबड, गोंधळ करायचा असेल तर असं करू नका, नाहीतर येऊ नका, असं तिने थेट सुनावलं. कार्यक्रमाला आलात तर तो कार्यक्रम व्यवल्थित पार पडू द्या, असं आवाहनही तिने सर्वांना केलंय.