राष्ट्रवादीमध्ये पुन्हा भाकरी फिरणार महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार यांनी तात्काळ आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग दिला आहे. आज पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचीही या बैठकीला उपस्थिती होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांआधीच अजित पवार गटाने निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकांत युवा नेतृत्वाला संधी देण्याचा फॉर्म्युला अजित पवारांची राष्ट्रवादी वापरण्याची शक्यता आहे. भाजपप्रमाणेच तरुण चेहऱ्यांना पुढे आणून संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणाम तर भोगावे लागतील ना… पुण्यातील राजकारणात वसंत मोरे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला असून, निकालानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडिया अकाऊंवरून पोस्ट शेअर केली आहे.“कात्रजच्या जनतेने त्यांना जमिनीवर आणलं” असे पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले आहेत. तसेच परिणाम तर भोगावे लागतील ना असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पोस्टमधून मोरे यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे. याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रमाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे परिणाम तर भोगावे लागतील ना…, असे पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले आहेत. या सोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. मुंबईत महापौरपदासाठी ठाकरे गट भाजपच्या पाठिशी मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरु झाल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचे कळते. या शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्याला उत्तर म्हणून असे पाऊल उचलले जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. भिवंडीत माजी महापौर विलास पाटलांच्या घरावर दगडफेक भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे. दगडफेकीनंतर विलास पाटलांनी कुटुंबीयांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलं. महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. भिवंडीमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झाला, त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. दरम्यान भिवंडीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शिंदेंच्या महापौरपदाच्या मागणीवर भाजपची प्रतिक्रिया मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून येत आहे. तर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, अशी एकनाथ शिंदेंची इच्छा आहे. त्यामुळे, अडीच वर्षे महापौरपद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मागण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केलीय. आमचे पार्लमेंटरी बोर्ड आहे, तिथे जी काही मागणी आहे ती येईल, माझ्याकडे तरी काही मागणी आलेली नाही. आमच्या पार्टमेंटरी बोर्डच्या बैठकीत एकनाथ शिंदे हेही आहेत. आमच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्रजी, अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून निर्णय घेतील. जर मागणी असेल तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार नाहीत असा मोठा दावा केलाय. एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल. अन्यथा बिर्याणीत गुळवणी ओतल्या सारखा प्रकार होईल. अजित पवार यांच्या पक्षाकडे कोणताही विचार नसल्याची टीका ही आमदार उत्तम जानकर यांनी केलीय. आमदार जानकर यांच्या विधानामुळे सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या आमदारांमध्येच मत भिन्नता असल्याचं समोर आलंय. मुंबई महापालिकेत घुमणार GEN Z आवाज महापालिका निवडणुकीच्या निकालात नव्या पर्वाची नांदी झालीय. घराणेशाही आणि अनुभवी चेहऱ्यांची चर्चा होत असतानाच मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये GEN Z नगरसेवक निवडून आलेत. मुंबईकरांनी 12 GEN Z नगरसेवकांना निवडून दिलयं… ज्याचं वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे बीएमसीत तरुणाईचा आवाज घुमणार आहे. नवीन जनरेशनच्या लोकप्रतिनिधींकडे शहराचा विकास करण्यासाठी ‘व्हिजन’ आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी हे तरुण प्रयत्न करणार आहेत.मुळात राजकारणात ‘अनुभव’ महत्त्वाचा असतोच. पण ‘जेन झेड’ नगरसेवकांच्या या दमदार एन्ट्रीने प्रशासकीय यंत्रणेतही नवा उत्साह आणि आधुनिक विचार येण्याची शक्यता आहे. …पण त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल- कपिल सिब्बल बीएमसी निवडणुकीत भाजपने एकूण ८९ जागा जिंकल्या. भाजपचे मित्रपक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २९ जागा जिंकल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त तीन जागा मिळाल्या. काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी या प्रकरणावर एक महत्त्वाचं विधान केलंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य करत ते म्हणाले, “तुम्ही भाजपशी करार करून सत्तेत याल आणि उपमुख्यमंत्रीही व्हाल, पण त्यानंतर तुमचे भविष्य उद्ध्वस्त होईल.” तसेच त्यांनी “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पहा. निकालानंतर त्यांना त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवावे लागले कारण त्यांना माहित होते की भाजप त्यांना फोडून त्यांना विकत घेईल. अजित पवार यांचेकडे पहा. एका पक्षाशी टिकून राहू न शकलेले अजित पवार महानगरपालिका निवडणुकीत फक्त तीन जागांवर घसरले. या निवडणुकीने अजित यांना फक्त नशीब महागात पडले आणि त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. भारतीय जनता पक्ष फक्त स्वतःचे हित पाहतो. विरोधकांना इशारा दिला पाहिजे की जर त्यांनी भाजपशी तडजोड केली तर ते सत्तेत येतील, उपमुख्यमंत्रीही होतील, पण त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. युएईचे अध्यक्ष आज भारत दौऱ्यावर येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आज भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. ही भेट भारत-UAE संबंधांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानली जातीय. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून शेख मोहम्मद बिन झायेद यांचा हा तिसरा अधिकृत भारत दौरा असेल. गेल्या दशकातील त्यांचा हा पाचवा भारत दौरा असेल. ही भेट दोन्ही देशांमधील वाढत्या धोरणात्मक विश्वासाचे उदाहरण देते. अलिकडच्या वर्षांत भारत आणि युएई दरम्यान वारंवार उच्चस्तरीय भेटी झाल्यात. सप्टेंबर २०२४ मध्ये, अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद आणि एप्रिल २०२५ मध्ये, दुबईचे क्राउन प्रिन्स आणि युएईचे संरक्षण मंत्री शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी भारताला भेट दिली. स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेनच्या अपघातात २१ जणांचा मृत्यू दक्षिण स्पेनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येतीय. कॉर्डोबा प्रांतात दोन हाय-स्पीड ट्रेन समोरासमोर आदळल्यानं किमान २१ जणांचा मृत्यू झालाय. तसच अनेक जण गंभीर जखमी झाले. असोसिएटेड प्रेसच्या मते, अलिकडच्या काळात स्पेनमधील हा सर्वात घातक रेल्वे अपघातांपैकी एक मानला जातोय. स्पेनच्या रेल्वे एजन्सी, एडीआयएफच्या मते, कॉर्डोबाच्या अदामुझ स्टेशनजवळ संध्याकाळी ५:४० वाजता जीएमटीच्या सुमारास हा अपघात झाला. सुरुवातीच्या माहितीनुसार, मलागाहून माद्रिदला जाणारी इरियो ६१८९ हाय-स्पीड ट्रेन अचानक रुळावरून घसरली आणि जवळच्या ट्रॅकवर गेली. माद्रिदहून हुएल्वाला जाणाऱ्या समोरून येणाऱ्या ट्रेनशी ती धडकली.दरम्यान, अपघाताची भीषणता एवढी होती कि यात अडकलेल्या लोकांना मशीनच्या साहाय्याने बाहेर काढावं लागलं.