मग हे जिंकले कसे? नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीने मुसंडी मारली तर महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीने विक्रम केला असून राज्यभर जल्लोष केला जात आहे. याच विजयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र आलेल्या सामनामधून टीका करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखामध्ये महायुतीच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात, ‘भाजपने महाराष्ट्रात असे काय दिवे लावले, कोणता विकास केला, जनहिताची कोणती कामे केली की त्यामुळे महाराष्ट्राची जनता भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांना भरघोस मतदान करून विजयी करत आहे? अर्थात, हीच जनता पुन्हा निकालानंतर उघडपणे सांगते की, ‘‘आम्ही यांच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला त्रासलो आहोत. आम्ही यांना मतदान केलेच नाही. मग हे विजयी कसे झाले हे रहस्यच आहे.’असे म्हटले आहे. पैशांनीच हे विजय विकत घेतले जाणार असतील तर या महाराष्ट्राची आन, बान, शान धुळीस मिळाली आहे आणि शिवरायांचा महाराष्ट्र अदानी, शहांच्या पैशांचा लाचार बनून सरपटताना दिसत आहे. हे चित्र देशासाठी धोकादायक आहे.’असे म्हणत चिंता व्यक्त केलीय. ====================== अमोल मोहिते यांचा नगराध्यक्षपदाचा नवा रेकॉर्ड राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी २ डिसेंबर आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडलेलं पालिका निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. भाजपने 129 नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे 2 ते 5 हजार मतांच्या फरकाने निवडून आले. मात्र, भाजपच्या एका उमेदवाराने तब्बल 42 हजारांहून अधिक मताधिक्य घेतलंय भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा केला पराभव. त्यामुळे, सातारा भाजपचाच बालेकिल्ला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचा करिष्मा दिसून आला. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढे मतदान झालं आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान पडले. ================= 77 वर्षांच्या आजीबाई बनल्या नगरसेवक राज्यातील नगरपरिषदा आणिनगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक रंजक निकाल पाहायला मिळाले. यापैकीच एक म्हणजे जळगावच्या नशिराबाद नगपरिषदेचा निकाल. नशिराबादमधून निवडून आलेल्या 77 वर्षांच्या जनाबाई भगवान रंधे यांचा विजय हा या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरला. यानिमित्ताने वय केवळ एक आकडा असतो, जनाबाई भगवान रंधे यांनी दाखवून दिले.नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, जेव्हा त्या नगरपरिषद प्रांगणात आल्या, तेव्हा त्यांना आपले अश्रू अनावर झाले. या विजयामुळे जनाबाई रंधे 77 व्या वर्षी नगरसेवक झाल्या आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालेल्या जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने जनाबाई भावूक होताना दिसल्या. ==================== आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचा गाजावाजा असताना चंद्रपूरमध्ये मात्र भाजपला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं.चंद्रपुरातील 11 पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.चंद्रपुरात झालेल्या पराभवावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “आम्ही हा पराभव नम्रतापूर्वक स्वीकारतो. विजय झाल्यावर माजायचं नाही, पराभव झाल्यावर लाजायचं नाही. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. चंद्रपुरातील पराभवाबद्दल वक्तव्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सुधीरभाऊ कुठे कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ आणि चंद्रपूरची महापालिका जिंकू. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरही मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली. म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे असा टोला मुनगंटीवारांनी लगावला. ===================== रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचा वारसा लाभलेल्या रेणापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार आव्हान देण्यात आले होते, मात्र अखेर भाजपाने रेणापूर आमचंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. रेणापूर नगरपंचायत निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची ठरली. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आजवर भाजपाचीच सत्ता असून, ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा आकनगिरे यांनी 2 हजार 576 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 17 सदस्यांच्या नगरपंचायतीत भाजपाने 10 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 5 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 1 जागा, तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत ====================== महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीनं मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज्यातील जनतेचं ऋण व्यक्त केले आहेत. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ========================= भारत हिंदू राष्ट्र, त्यासाठी कोणत्याही संवैधानिक मंजुरीची गरज नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणत त्याला कोणत्याही संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही कारण ते खरे आहे.असे म्हटले आहे. आरएसएसच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत यांनी हे विधान केले आहे. त्यांनी भारत एक हिंदू राष्ट्र आहे आणि जोपर्यंत देशात भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो तोपर्यंत ते हिंदू राष्ट्र राहील असे म्हटले आहे. सूर्य पूर्वेला उगवतो. हे केव्हापासून घडत आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून त्याला संवैधानिक मंजुरीची आवश्यकता आहे का? असे विधान देखील त्यांनी यावेळी केले. ============================== चीनला आणखी एक सोन्याचा साठा शोधण्यात यश चीनला आणखी एक सोन्याचा साठा शोधण्यात यश मिळाले आहे. शानडोंग प्रांतातील यांताय शहराच्या लाइझोउ किनाऱ्याजवळ समुद्राखाली सोन्याचा साठा सापडला आहे. समुद्राखालील साठ्यांच्या दृष्टीने हा आशियातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याच्या साठ्याचा शोध मानला जात आहे. समुद्राखालील या नव्या शोधामुळे लाइझोउ भागातील एकूण प्रमाणित सोन्याचा साठा ३,९०० टनांहून अधिक झाला असून, तो चीनच्या एकूण राष्ट्रीय साठ्याच्या सुमारे २६ टक्के आहे. त्यामुळे सोन्याचा साठा आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत लाइझोउ हा प्रांत चीनमध्ये अव्वल ठरला आहे. ही माहिती यांताय प्रशासनाने सध्याच्या पाच वर्षांच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील योजनेची रूपरेषा मांडण्यासाठी आयोजित केलेल्या परिषदेत जाहीर केली. ========================== वैभव मांगले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘वचन दिले तू मला’मध्ये वैभव मांगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत झळकणार आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र सर्वसाधारण पोलिस अधिकाऱ्यापेक्षा वेगळं आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अनुभव आणि सिस्टीम कोळून प्यायलेला अधिकारी म्हणून जगन्नाथ गुडपल्लीवारची ओळख आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, प्रसंगी स्वतःची पद्धत वापरत तो गुन्हे उकलतो. या सगळ्या बारकाव्यांमुळे हे पात्र साकारताना वैभव मांगलेला वेगळाच अनुभव मिळत असल्याचं त्याने सांगितलं. ===================== विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीसाठी कन्फर्म विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्वात मोठे आकर्षण म्हणजे माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माची उपस्थिती. रोहित 24 डिसेंबर रोजी सिक्कीम विरुद्ध आणि 26 डिसेंबर रोजी उत्तराखंड विरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळेल. बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार त्याचा सहभाग अनिवार्य आहे, ज्यामध्ये सर्व राष्ट्रीय संघातील खेळाडूंना दुखापतीशिवाय किमान दोन देशांतर्गत एकदिवसीय सामने खेळावे लागतील. दुसरीकडे, विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीची स्क्वाड जाहीर करताना डीडीसीएने विराट कोहलीची उपस्थिती कन्फर्म केली असून, ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हेही संघाचा भाग असतील, असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीसाठी सर्व संघांची घोषणा झाली असून यंदाच्या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिल्ली आणि मुंबईतून खेळताना दिसणार आहेत.