29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलंय. 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तर अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान , पालिका निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. ======================= जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या नियमांमध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याने एक महत्त्वपूर्ण बदल केलाय. यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीनवर पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे. या क्रमानेच उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्याने त्यासंबंधी एक जीआर प्रसिद्ध केलाय. या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आडनावाच्या अद्याक्षरानुसार क्रमवार नावे असायची. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या आणि राज्य प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे खाली जायची. आता नव्या गॅझेटनुसार, राष्ट्रीय पक्षाच्या आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे सर्वात वर असतील. ========================= भाजपच्या संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट जप्त राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला. पण सांगलीतील तासगाव निवडणुकीत भाजपच्या संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट जप्त झालेय. निवडणुकीनंतर तासगावमधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यावर थेट आरोप केले आहेत. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पराभवाला भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील जबाबदार आहेत, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवारांकडून करण्यात आली आहे. ========================== लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे पैसे एकत्र? नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरदेखील संपायला आला आहे. डिसेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता पुढे जाणार आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर महिलांना खुशखबर मिळू शकते. याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. =================== राज्यात गारठ्याची लाट डिसेंबर महिन्याच्या शेवटाकडे जात असतानाच तापमानाचा पारा अनेक भागांत खाली घसरला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून सकाळच्या वेळेत गारवा अधिक जाणवत आहे. आजही राज्यभरात हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय पुणे शहरात तसेच आसपासच्या ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसत आहे. रात्री आणि पहाटे गारठा वाढलेला असून तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरले आहे. मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांत किमान तापमानात घट झालीय..विदर्भातही गारठा वाढलेला असून नागपूरसह अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. राज्यभरात सध्या तापमानात चढ-उतार सुरू असून काही भागांत पारा लक्षणीयरीत्या घसरलाय. =================== राज्यसभेत २०२६ मध्ये ७५ जागांसाठी निवडणुका पुढच्या वर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार आहेत. केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर राज्यसभेच्या ७५ जागांसाठी देखील निवडणुका होणार आहेत. एप्रिल, जून आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये वरिष्ठ सभागृहातील जागा रिकाम्या होतील, ज्यामुळे एनडीए आणि इंडियाआघाडीमधील सत्ता संतुलन बदलण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत बिहारमधील पाच आणि उत्तर प्रदेशातील १० राज्यसभेच्या जागा रिकाम्या होतील. शिवाय, महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि अनेक ईशान्येकडील राज्यांमध्येही जागा रिक्त होऊन त्याठिकाणी निवडणूका होणार आहेत. ====================== एलआयसीकडून गृह कर्जाच्या व्याजदरात कपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सार्वजनिक बँका, खासगी बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून देखील व्याज दरात कपात करण्यात येत आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनं नव्या गृह कर्जाच्या व्याज दरात कपात केली आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियानं पुढील आर्थिक वर्षात त्यांचं गृहकर्जाचं वितरण 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असं म्हटलं आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सनं नव्या गृह कर्जाचा व्याज दर घटवून 7.15 टक्के केला आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनीनं नवे दर 22 डिसेंबरपासून लागू केल्याची माहिती दिली आहे.एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या या निर्णयाचा फायदा नव्या कर्जदारांना होणार आहे. घर खरेदीचा विचार करत असणाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे. ============== अमेरिकेत स्थलांतरितांसाठी नवी ऑफर अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी सेल्फ-डिपोर्टेशन चे आर्थिक प्रोत्साहन १ हजार डॉलरवरुन वरून ३ हजार डॉलरपर्यंत वाढवले आहे. वर्षाच्या अखेरीस CBP One अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी मोफत हवाई तिकीट देखील मिळेल.सोमवारी जारी केलेल्या निवेदनात, DHS ने म्हटले आहे की ३१ डिसेंबरपूर्वी सेल्फ-डिपोर्टेशन नोंदणी करणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना $3,000 रोख प्रोत्साहनपर रक्कम , सरकारकडून विमान तिकिट दिले जाई लआणि व्हिसा ओव्हरस्टेशी संबंधित नागरी दंड किंवा दंड माफ करण्यास पात्र असतील.डीएचएसने असा इशारा दिला आहे की जे लोक या उपक्रमात सामील होणार नाहीत त्यांना अटक केली जाईल आणि हद्दपार केले जाईल आणि भविष्यात अमेरिकेत प्रवेश करण्यापासून कायमचे बंदी घातली जाईल. =========================== विजय हजारे ट्रॉफीसाठी शुभमन गिलची निवड नव्या वर्षात टीम इंडिया पुन्हा एकदा नव्या जोशानं मैदानात उतरणार आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आधी एकदिवसीय आणि त्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) मालिका खेळणार आहे. ODI मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नसली, तरी T20I संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या टी-20 संघात शुभमन गिलला स्थान मिळाले नाही. गेल्या काही काळात टी-20 या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे गिलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जाते. टी-20 संघात स्थान न मिळाले असले, तरी विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली असून, त्यामध्ये भारताचे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. ====================== ‘आखिरी हिस्सा अभी बाकी है…’ अजय देवगन चा सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर दृश्यम च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेकर्सनी अखेर ‘ दृश्यम 3’ ची घोषणा केली असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. दृश्यमचा विजय साळगावकर पुन्हा एकदा मोठा पडद्यावर परतणार असल्याने चहा त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. दृश्यमच्या कथेत यावेळी कोणते नवे ट्विस्ट असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ‘आखिरी हिस्सा अभी बाकी है…’ असं म्हणत मेकर्सनी एक व्हिडिओ शेअर केलाय. मेकर्सकडून जारी करण्यात आलेल्या 1 मिनिट 13 सेकंदांच्या व्हिडिओत अजय देवगनचा दमदार आवाज ऐकायला मिळतो. या व्हिडिओत विजय साळगांवकर आपल्या कुटुंबाबद्दल बोलतो आणि आतापर्यंतच्या कथानकाची झलक दाखवली जाते. तर व्हिडिओच्या शेवटी विजय साळगांवकरचं वाक्य प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतं,ज्यामध्ये “कहाणी अजून संपलेली नाही… शेवटचा भाग अजून बाकी आहे.” असे म्हणतां दिसत आहे.