Raj Thackeray Post : मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची बहुप्रतिक्षित युती अधिकृतपणे जाहीर झाली. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये या युतीची आस लागली होती. अखेर ही इच्छा पूर्ण होताना दिसली, जेव्हा माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची थेट घोषणा केली. युतीच्या घोषणेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर एक विशेष पोस्ट (Raj Thackeray Post) केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर तसेच मुंबई महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांनी या पोस्टद्वारे मनसे आणि शिवसेना (उबाठा)च्या आगामी राजकीय रणनीतीची दिशा स्पष्ट केली असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भर देत महायुतीला लक्ष्य केले आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, युतीच्या भविष्याबाबत नवे संकेत मिळाले आहेत. राज ठाकरेंनी काय लिहिले पोस्टमध्ये? आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.’ हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील. त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत. युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे. त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील. मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल. आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात. माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल. सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र ! राज ठाकरे । मुंबईतील २२७ जागांसाठी जागावाटपाचा तपशील जाहीर झालेला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना (उबाठा)ला १४५-१५० जागा, तर मनसेला ६५-७० जागा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेत जागावाटप अंतिम झाले असून इतर ठिकाणी चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यात मराठी अस्मितेच्या राजकारणाला नवे बळ मिळाले असून महायुतीसमोरील आव्हान वाढले आहे. आता जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.