पुणेकरांना आता ‘जुना कारभारी’ नको महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर केले. यावेळी बोलताना मोहोळ यांनी,”पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून, शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असं म्हटलं.तसंच गेल्या पाच वर्षांत महापालिकेत काम करण्याची संधी पुणेकरांनी भाजपला दिली आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. पुणेकरांना आता जुना कारभारी नको आहे हे त्यांनी २०१७ च्या निवडणुकीत दाखवून दिलंय असं म्हणत विरोधकांवर टीका केलीय. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांची मोठी खेळी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवारांनी मोठी खेळी केलीय. त्यांनी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार पाहण्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. इंदापूर नगरपरिषदेचे अध्यक्षपद हे पद महिनाभरापासून रिक्त होते. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांसाठी संभाजी होळकर यांची नियुक्ती केलीय. मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या चार तालुक्यांची जबाबदारी विठ्ठल शिंदे यांच्याकडे देण्यात आलीय. तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि हवेली तालुक्यांसाठी राजेंद्र कोरेकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलीय. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणूक होणार असल्याने हे बदल केलेत. साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला २२ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून इच्छुकांना ११ जानेवारीपासून अर्ज वाटप होईल, अशी माहिती परिषदेचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड प्रताप परदेशी यांनी बुधवारी दिली.११ ते १६ जानेवारीमध्ये अर्ज वाटप होणार असून १९ ते २२ जानेवारी दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. छाननीनंतर वैध अर्ज २३ जानेवारी रोजी जाहीर होतील. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी असून २७ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर होईल. पाच फेब्रुवारी पासून पात्र आजीव सभासदांना मतपत्रिका पोस्टाने पाठवल्या जातील. त्यांनी मतदान करून त्या १३ मार्चपर्यंत परत पाठवायच्या आहेत. १५ मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल असे, परदेशी यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं संकल्पपत्र जाहीर महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आपलं संकल्पपत्र जाहीर केले. या जाहीर केलेल्या संकल्पपत्रात पुढील पाच वर्षांत पालिका स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून शहराचा विकास करण्यापेक्षा केंद्र व राज्य सरकारच्या निधीवर आधारित प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे. हा ३४ पानी संकल्पपत्रात प्रामुख्याने पुण्याला ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर’ (जीसीसी)ची राजधानी करणे, शहराच्या चारही दिशांना मेट्रोचा विस्तार, विमानतळाचा विस्तार, महामार्गांचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४ हजार ई-बस, एआय प्रणालीचा वापर, मध्यमवर्गीयांसाठी हक्काची घरं यासह अनेक आश्वासनं देण्यात आलीत. गेल्या दहा वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात झालेल्या व प्रगतीपथावरील कामांचाही यात समावेश केलाय. वाहतूक कोंडीवर ठोस नियोजन करणार -डॉ. निवेदिता एकबोटे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या विळख्यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी शाश्वत आणि ठोस नियोजन करण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक १२ (ड) छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथील भाजपच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी व्यक्त केलाय. डेक्कन परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी त्यांच्या पदयात्रेला धडाक्यात सुरुवात केली. या वेळी डाॅ. एकबोटे यांनी,” शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांपासून ते नगररचना विभागापर्यंत सर्वांमध्ये समन्वय साधून, महापालिकेत ‘स्वतंत्र वाहतूक समिती’ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करेन असं आश्वासन दिलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली भुयारी मार्गांची संकल्पना आणि मेट्रोचे विस्तारलेले जाळे यामुळे शहरातील वाहतुकीला मोठी गती मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. पिंपरीत काँग्रेसला घरघर पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसनं यंदा १२८ जागांपैकी केवळ ५८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवलेत. पक्षाला एकूण ३२ पैकी सहा प्रभागांमध्ये एकही उमेदवार देता आला नाही, तर केवळ चार प्रभागांमध्ये पूर्ण पॅनेल उभे करता आले. काँग्रेस ‘एकला चलो रे’ म्हणत स्वबळ अजमावत आहे. २०१७ मधील निवडणुकीत पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नव्हती. यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात अंतर्गत वाद झाले. त्यामुळं यंदा काँग्रेसला घरघर लागल्याचं दिसतंय. ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी २० वर्ष का लागली ? ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी २० वर्ष का लागली याचं उत्तर अखेर राज ठाकरेंनी दिलंय. सामना वृत्तपत्राला उद्धव आणि राज ठाकरेंनी संयुक्त मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. ‘कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे.सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!’ असं त्यांनी म्हटलं. विलासराव देशमुखांच्या आठवणी कोणीही पुसू शकणार नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत काँग्रेसनेते विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. “विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकणार नाही. विलासराव देशमुख यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे’, असं फडणवीसांनी म्हटलं. तसंच आम्ही जरी काँग्रेसच्या विरोधात लढत असलो तरी देखील विलासराव देशमुख यांच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रात उत्तम काम केलं, त्यापैकी एक विलासराव देशमुख आहेत. हे स्पष्टीकरण चव्हाणांनी देखील दिलं. निवडणुकीच्या काळात कोणीही दिलगिरी व्यक्त करत नाही, पण चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली. कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला होता”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यात मोठे बदल विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या दुसऱ्या टप्प्यामुळे मतदार यादीत महत्त्वपूर्ण बदल झालेत. नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या प्रारूप मतदार यादीतून अंदाजे 65 दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात आलीयेत. SIR सुरू होण्यापूर्वी, या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण मतदारांची संख्या 509 दशलक्ष होती, जी आता कमी होऊन 444 दशलक्ष झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मते, स्वच्छ आणि अचूक यादी सुनिश्चित करण्यासाठी हे बदल करण्यात आलेत. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, मतदारांना दावे आणि आक्षेप नोंदवण्याची संधी मिळेल जेणेकरून कोणत्याही त्रुटी दुरुस्त करता येतील. ट्रम्प आता भारतावर ५००% कर लादणार! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादणारे विधेयक मंजूर केलंय. यामुळ भारत आणि चीनवरील अमेरिकेच्या करांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, काही प्रकरणांमध्ये ते 500 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. युक्रेन युद्धादरम्यान रशियावर दबाव आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिलीय. अध्यक्ष ट्रम्प यांनी विधेयकाला मान्यता दिलीय. तसंच ट्रम्प यांच्यासोबतची बैठक चांगली झाली असून पुढील आठवड्यात काँग्रेसमध्ये या विधेयकावर मतदान होऊ शकते असं त्यांनी म्हटलंय.