“खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा” पुणे महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील दादागिरीची निवडणूक समजून काही लोक मनमानी आश्वासने देत आहेत.खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा, असा त्यांचा व्यवहार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मंगळवारी मारला.पुणे महापालिका निवडणुकीच्या महायुतीच्या ‘विजय संकल्प’ सभेची सांगता फडणवीस यांच्या सभेने झाली. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल, असा अपप्रचार करत आहेत; पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.मागील काळात विकासाच्या नावाखाली काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने उड्डाण पुलाचे बांधकाम केले. त्यामुळे विद्यापीठ येथील उड्डाण पूल पाडावा लागला. आम्ही पुढील वीस वर्षांचे नियोजन करत आहोत, असे फडणवीस यांनी नमूद केले. “पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीचाच महापौर!”-अजित पवारांचा मोठा दावा पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा आम्ही गाठणार असून, आम्हास इतर कोणत्या पक्षाची गरजच भासणार नसल्याचा दावाही पवार यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या हमीपत्रानुसार दिलेली वचने आम्ही पूर्ण करणार आहोत. यामध्ये मेट्रो आणि पीएमपीएमएल बसचा प्रवास सर्वांसाठी मोफत देणार आहे. मात्र, विरोधकांकडून हे शक्य नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मोफत प्रवासाचे वचन देताना तज्ज्ञ, अभ्यासकांशी चर्चा केली आहे. त्यासाठी केंद्र शासन अथवा राज्य शाशनाकडं जावं लागणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. “गन पॉईंटवर विमानतळे हस्तांतरित केली!” कोणत्याही उद्योग आणि उद्योगपतींच्या विरोधात नाही, तर विशिष्ट पद्धतीच्या मक्तेदारीच्या विरोधात आहे. टाटा, अंबानी किंवा हिंदुजा समूहाला आपले स्वत:चे उद्योग उभे करण्यासाठी ५०-६० वर्षे लागली, तिथे केवळ १० वर्षांत एखादी व्यक्ती एवढी मोठी कशी होते? एकाच उद्योगपतींची ‘ग्रोथ’ (वाढ) होत आहे, यापेक्षा ती कशी होतेय, हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे. हेच धोकादायक आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.अदानींनी नवी मुंबईचे विमानतळ वगळता एकही विमानतळ स्वतः बांधलेले नाही. चालती-बोलती विमानतळे आणि बंदरे त्यांना गन पॉइंटवर देऊन किंवा दबावाखाली हस्तांतरित करण्यात आली आहेत, असा आरोपही त्यांनी केला. “शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या अन् पैशांचे आमीष” महापालिका निवडणुकीत आम्ही आरोप- प्रत्यारोपांऐवजी सकारात्मक प्रचारावर भर दिला. मात्र, काही पक्षांतील उमेदवार मतदारांना पैशांचे आमिष दाखवत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देत दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.यासोबतच त्यांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यावर मतदारांनी चार मते देणे बंधनकारक असल्याचे अनेक मतदारांना माहिती नाही. त्यामुळे मतदारांना मतपत्रिका देताना प्रक्रिया स्पष्ट समजावून सांगावी. जेणेकरून मतदान बाद होण्याचे प्रमाण कमी होईल, असे आवाहनही डाॅ. गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाला केलंय. “महेश लांडगे नासका आंबा” राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय. अजित पवार आणि पिंपरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता भोसरीतील सभेतली अजित पवारांनी महेश लांडगे यांच्यावर जहरी टीका केली. महेश लांडगे नासका आंबा असल्याची टीका अजित पवारांनी केली. ते म्हणाले की, बिबट्या बरोबर आता लांडगे पण आलेत. सगळे लांडगे एका माळीचे मणी नाहीत. एखादा आंबा नासका असतो. पण तो वेळीच काढला नाही तर तो अख्खी आळी नासवतो. पुण्यातला भ्रष्टाचार वाढलाय, पुणे शहराचं झालेलं वाटोळं पाहून मला फार चीड येते असं अजित पवार म्हणाले. “त्या उमेदवाराचे चिन्ह काढून घेणार का?”- मुरलीधर मोहोळ आरपीआयला राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटणीत मिळालेल्या आठ जागांपैकी चार जागांवर अजित पवार यांनी स्वत:च उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचेच नाही, असे आरपीआय शहराध्यक्ष सचिन खरात यांनी ठणकावून सांगितले. असे असताना आरपीआय उमेदवाराला दिलेले घड्याळाचे चिन्ह काढून घेणार का, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना विचारला आहे. तुम्ही गुन्हेगारांना उमेदवारी कशी दिली, हे पवार यांना पत्रकारांनी विचारले, त्या वेळी त्यांनी शेजारच्या मित्रपक्षाकडे बोट दाखवले आणि आरपीआयच्या सचिन खरात यांनी उमेदवार दिल्याचे सांगितले. मात्र, खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आपले उमेदवार नाहीत, असा खुलासा करत निवडणुकीतून माघार घेतली. मग त्या चार- पाच उमेदवारांकडून त्यांचे चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत हे जाहीर करणार का, असा प्रश्न मोहोळ यांनी विचारला आहे. सत्ता असूनही पुण्यासाठी पुरेसा निधी नाही-अरविंद शिंदे केंद्र व राज्यात, महापालिकेत भाजपची सत्ता असताना पुण्यासाठी पुरेसा निधी मिळालाच नाही. पुण्याचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नाही. स्मार्ट सिटी योजना, २४ तास पाणीपुरवठा योजना आणि बीआरटी योजना गुंडाळल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मेट्रोची संकल्पना पुढे आणली होती. पुण्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करता २०० किमी मेट्रो अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र ती केवळ ३२ किमीपर्यंतच मर्यादित राहिली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पुणेकरांमध्ये बदलाची अपेक्षा निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. डोंबिवली शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना रुग्णालयातून घेतलं ताब्यात डोंबिवली भाजप- शिंदेसेना हाणामारी प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. रवी पाटील आणि नितीन पाटील या शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातून पोलिसांनी ताब्यातघेतलं होतं.पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. डोंबिवलीमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आजपासून बदलणार पंतप्रधान मोदींचे कार्यालयीन पत्ता मकर संक्रांतीपासून म्हणजेच आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलेल. साउथ ब्लॉकमध्ये असलेले पीएमओ “सेवा तीर्थ” संकुलात स्थलांतरित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पीएमओचे स्थानच बदलणार नाही तर त्याची कार्यपद्धतीही बदलेल. याचा अर्थ असा की, देशातील सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणा आता एका नवीन आणि आधुनिक संकुलातून काम करेल. “सेवा तीर्थ” दारा शिकोह रोड (पूर्वी डलहौसी रोड) वर स्थित आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) साउथ ब्लॉकमध्ये आहे. मात्र, ते आता त्याठिकाणी हलवले जात आहे. नवीन कार्यालय संकुल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल -डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये देशव्यापी निदर्शने तीव्र होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिलाय. जर इराणी सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध हिंसक कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. डेट्रॉईटमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, विशेषतः निदर्शकांच्या हत्या आणि कथित फाशीच्या बातम्यांवर आमचं लक्ष आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान , इराणमधील निदर्शनांचा तिसरा आठवडा सुरु झाला असून त्याठिकाणची आंदोलनाची धग काही केल्या कमी होताना दिसत नाही.