महापौर आरक्षणाची सोडत गुरुवारी राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले तरी आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महापौर कोणत्या प्रवर्गातून निवडला जाणार, हे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीतून स्पष्ट होणार आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप महायुतीने जवळपास 24 ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे बहुतांश महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण वेगळे असल्याने, येथे महापौर कोणत्या पक्षाचा होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, महापौरपद थेट संख्याबळावर नव्हे, तर आरक्षणावर अवलंबून असते. दरम्यान,जर मुंबई महापालिकेत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षण निघाले, तर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळू शकते. कारण, एसटी प्रवर्गातील दोन्ही जागांवर शिवसेना (ठाकरे गट) चे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप किंवा शिंदे गटाकडे एकही एसटी प्रवर्गातील विजयी नगरसेवक नाही. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आणि धाकधूक निर्माण झालीय. ऐन झेडपीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागताच भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेतले जात आहेत. मात्र त्याच दरम्यान कोकणातून भाजपची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी एकामागून एक राजीनामे दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा शिंदेसेना महायुतीची अधिकृत घोषणा केली. मात्र त्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. एकामागून एक अशी ४३ जणांनी आपले राजीनामे दिलेत. एकनाथ शिंदेंच्या खेळीने भाजप राहणार सत्तेपासून दूर उल्हासनगर महानगरपालिकेत निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णायक डाव टाकत सत्ता स्थापनेचा मार्ग काढलाय. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिंदेसेना महापालिकेत सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झालं असून, या घडामोडींमुळे भाजप सत्तेपासून दूर राहणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय काँग्रेसचा 1, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. 78 सदस्यांच्या सभागृहात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा आणि अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेचं संख्याबळ निर्णायक टप्प्यावर पोहचलाय. नवनीत राणांविरोधातील पत्रावर चुकून सह्या केल्या महापालिका निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात तक्रार केली. आता त्या तक्रारीवरून काहींनी घुमजाव केल्याचं दिसून आलं. तक्रारीच्या पत्रावर आम्ही चुकून सह्या केल्या, त्या आमच्या सह्या नाहीत अशी कारणं आता काही उमेदवार देत आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 22 जणांनी नवनीत राणांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि राणांना भाजपमधून काढण्याची मागणी केली होती. आता ज्या पराभूत उमेदवारांनी तक्रार केली, त्यातल्या बहुतांश उमेदवारांनी त्यावर स्पष्टीकरण देत व्हिडीओ प्रसारित केला. नवनीत राणांविरोधातील त्या तक्रारीवर आमच्या चुकून स्वाक्षऱ्या झाल्या असं काहींनी सांगितलं. तर त्या सह्या आमच्या नाहीत असा दावा काहींनी केला. नवनीत राणा आमच्या नेत्या आहेत आणि भविष्यातही राहतील असं काही पराभूत उमेदवारांनी म्हटलं. अजित पवारांच्या या बड्या नेत्याच्या हाती धनुष्यबाण पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव -जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा अरुण गिरे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र या गटातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे नाराज झालेल्या अरुण गिरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरू नये, तसेच त्यांना इतर पक्षांकडून तिकीट मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महापालिका निवडणुकीप्रमाणेच शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतलाय. अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवसांचा अवधी उरला आहे. अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांच्या हातात एबी फॉर्म शेवटच्या क्षणी देण्यात येणार असल्याने अधिकृत उमेदवाराशिवाय कोणीही अर्ज दाखल करू शकणार नाही, असा पक्षाचा अंदाज आहे. राज्यात पुन्हा दिवस थंडीचा कडाका वाढणार मागच्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळाले. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढली असून पुढचे काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवू शकते.हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात हवामान मुख्यत: स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. या भागांत कमाल तापमान ३० ते ३२ अंशांच्या दरम्यान, तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. काँग्रेसची जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी नवी आघाडी महापालिका निवडणुकांत वंचितसोबतच्या आघाडीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन आघाडी पक्षाशी आघाडी केली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर ही आघाडीची घोषणा केली. ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेससोबत केलेली आघाडी केवळ सत्तेसाठी नसून एका व्यापक भूमिकेतून सामाजिक न्यायासाठी झाली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केल्यानंतर मोदी सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागला, पण अजूनही जातनिहाय जनगणना झालेली नाही. ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागीदारी ही काँग्रेसची भूमिका आहे.असं सपकाळ यांनी म्हटलंय. कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव सस्पेंड सोन्याच्या तस्करीतील आरोपी अभिनेयत्री राण्या रावचे वडील आणि डीजीपी रामचंद्र राव यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. राव यांचे त्यांच्या कार्यालयातील आक्षेपार्ह वर्तन करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणामुळे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडालीय. मात्र, राव यांनी हे आरोप फेटाळून लावलेत आणि हा व्हिडिओ बनावट आणि खोटा असल्याचं म्हटलंय. त्यांनी याविषयी बोलताना हा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ असून माझी बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला असल्याचं म्हटलं. पाकिस्तानमध्ये शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव किस्तानमधील कराचीमधील शॉपिंग मॉलमध्ये भयंकर आगीची घटना घडली. गुल प्लाझामध्ये अग्नितांडव झाला, या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८१ जण बेपत्ता आहेत. तब्बल ३४ तासांच्या आटोकाट प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. बेपत्ता ८१ जणांचा शोध घेण्यात येत आहे. भीषण दुर्घटना घडलेली इमारत असुरक्षित असल्याचा रिपोर्ट स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे. २६ मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनएची पडताळणी होत आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर पाकिस्तान सरकारकडून पीडितांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली आहे.