Legislative Council Election: राज्य विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपने आपल्या वाट्याला येणाऱ्या ६ जागांसाठी तब्बल ३० संभाव्य उमेदवारांची नावे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. या निवडणुकीत माजी आमदार प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले, तरी उर्वरित ५ जागांसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक यांच्यात कडवी स्पर्धा आहे. यातून योग्य उमेदवारांची निवड करताना भाजपला कडक नियमांची चाळणी लावावी लागणार आहे. भाजपच्या पारड्यात सर्वाधिक ६ जागा – Legislative Council Election: भाजपने 6 जाागांसाठी ‘या’ 30 नेत्यांची नावं पाठवली दिल्लीला; काॅंग्रेसमधून आलेल्या एकाची उमेदवारी निश्चित येत्या १२ मे रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार असून विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या पारड्यात सर्वाधिक ६ जागा पडणार आहेत. महायुतीकडे असलेले आमदारांचे पाठबळ पाहता त्यांचे ८ उमेदवार सहज निवडून येतील, असे चित्र सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ केवळ एकाच जागेसाठी पुरेसे आहे. (Legislative Council Election) या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या ३० उमेदवारांच्या यादीत संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. दिल्लीला पाठवलेल्या यादीत माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूकर, दादाराव केचे, संजय भेंडे आदींची नावे आहेत. कडक निकष लावण्याचे संकेत – (Legislative Council Election) पक्षाने उमेदवारी निश्चित करताना काही कडक निकष लावण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना यावेळी विधान परिषदेवर संधी न देण्याचे धोरण भाजपने स्वीकारल्याचे समजते. जनतेतून निवडून येऊ न शकलेल्यांचे ‘मागच्या दाराने’ राजकीय पुनर्वसन करण्याऐवजी, पक्षाच्या संघटनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणे मांडणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे प्रस्थापित नेत्यांच्या गोटात अस्वस्थता असून अनेक जुन्या नावांना कात्री लागण्याची चिन्हे आहेत. प्रज्ञा सातव यांचे नाव ६ पैकी एका जागेवर निश्चित – काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांचे नाव ६ पैकी एका जागेवर निश्चित मानले जात आहे. सातव यांच्या भाजप प्रवेशावेळीच त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत देण्यात आले होते. आता उर्वरित ५ जागांवर कुणाची वर्णी लागणार, याचा फैसला पुढील आठवड्यात भाजपचे केंद्रीय नेतृत्व करणार आहे. नेहमीप्रमाणे या निवडीतही भाजप ‘धक्कातंत्राचा’ वापर करून अनपेक्षित नावे समोर आणण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता दिल्लीतून येणाऱ्या अंतिम यादीकडे लागले आहे. यांचा कार्यकाळ संपणार – उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे.