Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ चा निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. हाय व्होल्टेज लढतीत शिवसेना (शिंदे गट) चे शारंगधर देशमुख यांनी पिछाडी भरून काढत विजय मिळवला असून, काँग्रेसचे राहुल माने यांना मोठा धक्का बसला आहे. या विजयामुळे शिंदे गटाला शहरात मोठे बळ मिळाले आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये शारंगधर देशमुख हे तब्बल १७०० मतांनी पिछाडीवर होते. मात्र, पुढील फेऱ्यांत त्यांनी आघाडी घेत अखेर विजय खेचून आणला. या निकालाकडे सतेज पाटील, धनंजय महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, सध्याच्या कलानुसार कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर सुरू आहे. सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती; मात्र नंतर भाजप आणि महायुतीने जोरदार पुनरागमन करत काँग्रेसला ओव्हरटेक केले. काही टप्प्यांवर भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष डबल डिजिटमध्ये पोहोचले होते. प्रभागनिहाय निकालांचे चित्र प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत चारही उमेदवार विजयी केले. सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार आणि सचिन चौगले यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपचे चारही उमेदवार प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते आणि विजेंद्र माने विजयी झाले. प्रभाग क्रमांक १० मध्ये शिंदे गटाचे अजय इंगवले विजयी झाले असून काँग्रेसचे दत्ता टिपूगडे पराभूत झाले. याच प्रभागात भाजपच्या अर्चना कोराणे विजयी ठरल्या. सत्ता कुणाची? महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी ४१ जागांचा ‘मॅजिक फिगर’ पार करणे आवश्यक आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले नसल्याने, निकालानंतर आघाड्या आणि युतींचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीचा संदर्भ गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसचे २७, राष्ट्रवादीचे १५ असे एकूण ४२ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेने बाहेरून पाठिंबा दिला होता. मतदानाचा कौल कोल्हापुरात यंदा ६६.५४ टक्के मतदान झाले. सुरुवातीला मतदान संथ गतीने झाले असले, तरी दुपारनंतर मतदारांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे निकालाबाबत शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहिली. कोल्हापूरकरांचा अंतिम कौल कुणाच्या बाजूने जाणार आणि शहराची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे पूर्ण निकालानंतरच स्पष्ट होणार असून, पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.