India-Germany historic agreement: भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांनी टपाल, एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एका महत्त्वाच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज हे सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय भागीदारीचा विस्तार करण्यावर सविस्तर चर्चा झाली. या दौऱ्यात शिक्षण क्षेत्रासह व्यापार आणि लॉजिस्टिक क्षेत्रात नवे संबंध प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. या विशेष करारांतर्गत भारत आणि जर्मनी मिळून एक ‘प्रीमियम इंटरनॅशनल एक्सप्रेस’ उत्पादन सादर करणार आहेत. यामध्ये वेळेची मर्यादा पाळणारी आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस सेवा सुरू केली जाईल. या सेवेसाठी भारतीय टपाल विभागाचे (इंडिया पोस्ट) देशातील शेवटच्या टोकापर्यंत असलेले जाळे आणि जर्मनीच्या ‘डॉयचे पोस्ट-डीएचएल’ ग्रुपचे जागतिक लॉजिस्टिक नेटवर्क यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. यामुळे भारतातून परदेशात जाणाऱ्या मालाचा प्रवासाचा वेळ कमी होणार असून, ग्राहकांना पार्सलची स्थिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत अचूकपणे ट्रॅक करता येईल. हा करार भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राला अधिक सक्षम करणारा ठरणार आहे. या सहकार्यामुळे देशातील निर्यातीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय व्यावसायिकांचा वाटा वाढेल. विशेषतः आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्सला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचा हा पहिलाच आशिया दौरा असून, त्यांनी भारताशी असलेल्या संबंधांना विशेष महत्त्व दिले आहे. या करारामुळे केवळ लॉजिस्टिक सेवांची गुणवत्ता सुधारणार नाही, तर भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मिळणारा प्रवेश अधिक सुकर होणार आहे. १२ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या करारामुळे भारत आणि जर्मनीमधील आर्थिक संबंधांचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.