Inderjit Singh Bindra passes away : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आधुनिक भारतीय क्रिकेटची दिशा बदलणारे दिग्गज प्रशासक इंद्रजीत सिंग बिंद्रा (आय. एस. बिंद्रा) यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. गेल्या चार दशकांपासून भारतीय क्रिकेटची सेवा करणाऱ्या बिंद्रा यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक माजी आयएएस अधिकारी ते यशस्वी क्रिकेट प्रशासक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. विश्वचषक भारताच्या मातीत आणला! बिंद्रा यांनी जगमोहन दालमिया आणि एनकेपी साळवे यांच्या साथीने १९८७ मध्ये विश्वचषक स्पर्धा इंग्लंडच्या बाहेर पहिल्यांदाच भारतीय उपखंडात आयोजित करण्याचे शिवधनुष्य पेलले. त्यानंतर १९९६ च्या विश्वचषकाचे यशस्वी आयोजन करून त्यांनी भारताला जागतिक क्रिकेटचे राजकीय आणि आर्थिक केंद्र बनवले. प्रसारण हक्कांच्या मक्तेदारीला दिले आव्हान – १९९४ पर्यंत भारतीय क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणावर केवळ दूरदर्शनची मक्तेदारी होती. बिंद्रा यांनी या मक्तेदारीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या या ऐतिहासिक कायदेशीर लढाईमुळे खाजगी आणि जागतिक प्रसारकांसाठी दरवाजे उघडले गेले. यामुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात हजारो पटीने वाढ झाली आणि क्रिकेट हा एक मोठा व्यवसाय बनला. इंद्रजित सिंग बिंद्रा यांचे निधन आयपीएल आणि पंजाब क्रिकेटचे नंदनवन – आयपीएलचे सल्लागार: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या ‘आयपीएल’च्या स्थापनेत बिंद्रा यांचा सल्ला मोलाचा ठरला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच बीसीसीआय आज जगातील सर्वात शक्तिशाली बोर्ड बनले आहे. मोहाली स्टेडियमची निर्मिती: पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (PCA) अध्यक्ष असताना त्यांनी अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या पंजाब क्रिकेटचे रूप पालटले. मोहाली येथील जागतिक दर्जाच्या पीसीए स्टेडियमची निर्मिती हे त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक आहे. हेही वाचा – Inderjit Singh Bindra passes away : क्रिकेट प्रशासनातील एक सुवर्णकाळ संपला! BCCI चे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे निधन भारतीय क्रिकेटमधील सुवर्णकाळाचा अंत – बिंद्रा केवळ एक प्रशासक नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले नेते होते. खेळाडूंचे हित आणि खेळाचे व्यावसायिक मूल्य यांचा समतोल त्यांनी साधला. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक माजी खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.