Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून, अशातच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा नाना पटोलेंनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या मंत्र्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचे पटोलेंनी सांगितले. नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “या विषयावर आम्ही यापूर्वीही विधानसभेत आवाज उठवला होता. खरातकडून माहिती बाहेर येत असली तरी, या प्रकरणातील महत्त्वाच्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.” तसेच “या संपूर्ण प्रकरणात चार मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत आणि त्याबाबतची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल,” असा मोठा त्यांनी केला आहे. संबंधित मंत्र्यांच्या सहभागाबाबतची सविस्तर माहिती आणि पुरावे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. ज्या मंत्र्यांची नावे या प्रकरणात समोर येत आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बाहेर काढावे, ही आमची प्रमुख मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. अत्याचाराचे कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या. तसेच अनेक व्यावसायिकांची खरातने फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात अशोक खरातच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राजकीय वातावरण आणखी तापणार या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरुन पाय उतार व्हावे लागले तर त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांची देखील चौकशी करण्यात आली होती. आता खरात प्रकरणात मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांच्या सहभाग असल्याच्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. हेही वाचा : TamilNadu CM Oath Ceremony: तामिळनाडूमध्ये आजपासून ‘विजय राज’ सुरू ; थलपथी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ