लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये कधी होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मानधन 2100 रुपये करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिले. आतापर्यंत पावणेदोन कोटी महिलांनी eKYC पूर्ण केले असून अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. योजनेत पाच हजार 136 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आणि अपात्र व पुरुषांनी लाभ घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली व सभात्याग केला. अपात्र लाभार्थ्यांकडून दोन महिन्यांत वसूल करून कारवाई केली जाईल, असे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 26 लाख लाभार्थ्यांच्या यादीपैकी 22 लाख पात्र असून 4 लाखांची फेरपडताळणी होईल. 8 हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी नियमांविरुद्ध लाभ घेतल्याचेही तटकरे यांनी नमूद केले. मानधन वाढीवर सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि योजना बंद होणार नाही, असे शिंदे म्हणाले. या वाहनांची टोलवसुली त्वरित थांबवण्याचे निर्देश – समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोल रद्द – पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देणारे धोरण लागू केले असतानाही, समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ई-वाहनांकडून बेकायदेशीरपणे टोल आकारणी सुरू असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परिवहन विभागाला टोलवसुली त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार अनिल पाटील आणि नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नार्वेकर यांनी सरकारी धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे सांगून, टोलमाफीची अंमलबजावणी आठ दिवसांत काटेकोरपणे करावी, असे आदेश दिले. नगरविकासमंत्री दादा भुसे यांनी तांत्रिक कारणांमुळे अंमलबजावणीस विलंब झाल्याचे स्पष्टीकरण दिले. …तर पोलिसांना ई-चलनची कारवाई करता येणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना होणारे वाद आणि गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे अनिवार्य करण्यात येणार आहेत. गोव्याच्या धर्तीवर हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल. बॉडी कॅमेरा नसेल तर पोलिसांना ई-चलनची कारवाई करता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. ई-चलन कारवाईत काही अधिकारी खासगी मोबाईल वापरून गैरव्यवहार करत असल्याच्या तक्रारी शिवसेना (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडल्या होत्या. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बॉडी कॅमेऱ्यामुळे पारदर्शकता येईल, असे स्पष्ट केले. यासोबतच, मुंबईतील दुचाकी पार्किंग समस्येवर लक्ष देण्यासाठी डीसीआरमध्ये बदल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. जुन्या ई-चलनच्या वसुलीसाठी लोकअदालत आणि ६ महिन्यांत वसूलीची नवी व्यवस्था केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “पंतप्रधान ईव्हीएम नाही, तर लोकांची मनं हॅक करतात”- कंगना रनौत यांचे लोकसभेत आक्रमक भाषण – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक प्रक्रियेवरील चर्चेदरम्यान मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत यांनी लोकसभेत आक्रमक भाषण केले. त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करत विरोधी पक्षांवर सभागृहात ‘तमाशा’ केल्याचा आणि मानसिक तणाव निर्माण केल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘खादी’ व आंतरराष्ट्रीय महिलेच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली. “पंतप्रधान ईव्हीएम नाही, तर लोकांची मनं हॅक करतात,” असे त्या म्हणाल्या. बॅलेट पेपरच्या मतदानावर टीका करताना त्यांनी इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण खटल्याची आठवण करून दिली. सोनिया गांधींच्या नागरिकत्वावरून त्यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. शशी थरूर यांचा ‘वीर सावरकर पुरस्कार’ स्वीकारण्यास नकार – नाराजी व्यक्त करत थरूर यांनी आयोजकांना ठरवले बेजबाबदार – काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ‘एचआरडीएस इंडिया’ संस्थेकडून दिला जाणारा ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५’ स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पुरस्कारासाठी सहा नावांपैकी त्यांची निवड झाल्याची घोषणा संस्थेने केली होती. मात्र, थरूर यांना प्रसारमाध्यमांमुळे याची माहिती मिळाली. याबद्दल नाराजी व्यक्त करत थरूर यांनी आयोजकांना बेजबाबदार ठरवले आहे. “मला न विचारता, पूर्वकल्पना न देता नाव घोषित करण्यात आले आहे आणि मी हा पुरस्कार स्वीकारलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथे आज १० डिसेंबर होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होईल. थरूर यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचा किंवा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेने एच-१बी व्हिसा मुलाखती थांबवल्या – जानेवारीपासून तब्बल ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द – अमेरिकेने एच-१बी व्हिसा मुलाखती थांबवल्या असून, जानेवारीपासून तब्बल ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रद्द झालेल्या व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. अवैध स्थलांतर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासन अधिक गंभीर झाले आहे. या कठोर भूमिकेमुळे व्हिसा नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. नवीन धोरणांनुसार, एच-१बी व्हिसा अर्जदारांना आता त्यांची सोशल मीडिया खाती सार्वजनिक करावी लागणार आहेत. अमेरिकेच्या हिताच्या विरोधात कोणतीही सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आढळल्यास व्हिसा रद्द केला जाईल. भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने अर्जदारांना सूचना दिली आहे की, ज्यांची मुलाखत तारीख बदलली आहे, त्यांनी नवीन तारखेलाच उपस्थित राहावे; अन्यथा त्यांना दूतावासात प्रवेश नाकारला जाईल. दारू पिऊन वाहन चालवणे, चोरी आणि मारामारी यांसारख्या गुन्ह्यांमुळे व्हिसा रद्द होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या कठोर नियमांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चांदी 7,457 ने वाढून 1.86 लाख प्रति किलोवर – या वर्षी किंमत 1 लाख रुपयाने वाढली – आज म्हणजेच 10 डिसेंबर रोजी चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, चांदी 7,457 रुपयांनी वाढून 1,86,350 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. यापूर्वी काल ती 1,78,893 रुपयांवर होती. यावर्षी तिच्या किमतीत 1,00,333 रुपयांची वाढ झाली आहे. तर सोने 116 रुपयांनी वाढून 1,28,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. यापूर्वी ते 1,27,974 रुपयांवर होते. सोन्याने 17 ऑक्टोबर रोजी 1,30,874 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. IBJA च्या सोन्याच्या दरांमध्ये 3% GST, मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा समाविष्ट नसतो, त्यामुळे वेगवेगळ्या शहरांतील दर वेगवेगळे असतात. पंजाब नॅशनल बँकसह अनेक बँका गोल्ड लोनचे दर निश्चित करण्यासाठी या दरांचा वापर करतात. ‘या’ कारणामुळे शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला – सेन्सेक्स 275 अंकांनी घसरला – भारतीय शेअर बाजार बुधवार, १० डिसेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. बाजाराने सकारात्मक सुरुवात केली असली तरी दुपारपर्यंत सर्व वाढलेले शेअर्स घसरले. व्यवहार संपताच सेन्सेक्स २७५.०१ अंकांनी घसरून ८४,३९१.२७ वर बंद झाला. निफ्टीही ८१.६५ अंकांनीने घसरून २५,७५८ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरून बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५८% ने घसरला. आयटी, टेलिकॉम, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय आणि औद्योगिक समभागांमध्ये ही घसरण सर्वाधिक दिसून आली. मात्र, धातू आणि ऊर्जा समभागांमध्ये वाढ दिसून आली, ज्यामुळे बाजाराला काही आधार मिळाला. या घसरणीमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणांपूर्वीची अनिश्चितता, कमजोर जागतिक संकेत, विदेशी गुंतवणूकदारांची सलग नवव्या दिवशीची मोठी विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही चार प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. ‘धुरंधर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ – ‘या’ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले – यामी गौतमचे पती आणि यशस्वी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलरने अवघ्या पाच दिवसांत १५२.७५ कोटींची कमाई करत मोठा टप्पा ओलांडला आहे. या यशाने ‘धुरंधर’ हा रणवीरच्या सहा वर्षांतील ‘गली बॉय’ कमाई १३९.६३ कोटी पेक्षा मोठा चित्रपट ठरला आहे. लवकरच हा सिनेमा करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ १५३.५५ कोटीला मागे टाकून सर्वाधिक कमाईचा विक्रम करेल. चित्रपटाची सध्याची गती पाहता, तो लवकरच रणवीरच्या ‘सिम्बा’ २९५ कोटी आणि आदित्य धर यांच्याच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ २४४.१४ कोटी या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. २८० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात १९३ कोटींची कमाई केली आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोहलीची मोठी झेप- रोहित-विराटमध्ये ‘नंबर वन’ साठी चुरस- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तो दोन स्थानांनी वर चढत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचा फायदा झाला. ज्यामुळे त्याचे रेटिंग पॉइंट आता ७७३ झाले आहेत. मात्र, रोहित शर्मा ७८२ रेटिंग पॉइंट्ससह अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. रोहित आणि कोहलीच्या रेटिंग पॉइंट मधील अंतर आता खूप कमी झाले आहे, ज्यामुळे ‘नंबर वन’ साठी दोघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.