अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने ज्या १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना निलंबित केले होते, त्यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा सोहळा पार पडला. यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सर्व १२ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, या कारवाईला न जुमानता प्रदीप पाटील यांनी आपल्या गटासह भाजपचा झेंडा हाती घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला. यामध्ये दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील, मनीष म्हात्रे यांसह एकूण १२ जणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ‘काँग्रेससोबत युती करणार नाही’ असे स्पष्ट केले होते. मात्र, आता नगरसेवकांनीच थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने तांत्रिक अडचण दूर झाली असून अंबरनाथ नगरपरिषदेवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसचे संघटन मजबूत ठेवणाऱ्या प्रदीप पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घटनेवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. “सत्तेसाठी भाजप तत्त्वे आणि विचार बाजूला ठेवणारा पक्ष आहे,” असे म्हणत त्यांनी अकोटमधील भाजप-एमआयएम युतीचा दाखला दिला. काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवर कारवाई केली, मग भाजपने अशा फुटीर नेत्यांना पक्षात घेणाऱ्या आपल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या घडामोडींमुळे अंबरनाथच्या राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.