BJP Politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात भारतीय जनता पार्टीला (भाजप) निवडणुकीपूर्वीच (BJP Politics) मोठा झटका बसला आहे. मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २२ वर्षांपासून पक्षात एकनिष्ठपणे कार्यरत असलेल्या मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष कमालीचा वाढला आहे. मोंडकर यांनी या पराभवाला जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणे आणि अकार्यक्षमतेला जबाबदार धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राणे समर्थक आणि जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पूर्णपणे डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे पक्षात समांतर यंत्रणा राबवण्यात आली, ज्याचा थेट परिणाम पराभवात झाला. युतीबाबत संभ्रम आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नगरपरिषद निवडणुकीच्या काळात जिल्हा नेतृत्वाने मित्रपक्ष (शिवसेना-शिंदे गट) सोबत युती करण्याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण केला. सुरुवातीला युती नाकारण्यात आली, नंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याची रणनीती आखण्यात आली. ही रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली आणि पक्षाचा पराभव झाला. संघटनेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा स्तरावरून “पटत नसेल तर राजीनामा द्या” अशी उत्तरे देण्यात आली, असा गंभीर आरोप मोंडकर यांनी केला आहे. “केवळ निवडणुकीपुरता वापर” बाबा मोंडकर यांनी पक्ष नेतृत्वावर सर्वात मोठा आरोप केला की, कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतला जातो. निवडणुकीनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचा रोख मुख्यतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. मोंडकर यांनी तडकाफडकी दिलेल्या या राजीनाम्यामुळे संपूर्ण जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात महापालिका निवडणुकीची लगबग सुरू असताना मालवणसारख्या ठिकाणी पक्षातील हे बंडखोरीसदृश पाऊल भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. हा घटनाक्रम पक्षाच्या स्थानिक पातळीवरील अंतर्गत कलह आणि नेतृत्वाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.