Maharashtra Politics : भिवंडी महापालिकेच्या सत्तासंघर्षाने नवे राजकीय वळण घेतले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये उघड फुट पडल्याचे स्पष्ट झाले असून, काँग्रेसने रणनीती आखत महायुतीसह ठाकरे गटाला धक्का दिला आहे. महापौरपदावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे चित्र समोर आले. या अंतर्गत कलहाचा फायदा घेत काँग्रेस आघाडीने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची महापौरपदी निवड झाली. निवडणुकीत नारायण चौधरी यांना तब्बल ४८ मते मिळाली, तर अधिकृत भाजप उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ १६ मते मिळाली. विशेष म्हणजे भाजपचीच ६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी उघडकीस आली आहे. या घडामोडींमुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात असून, काँग्रेस आघाडीने अनपेक्षित डाव टाकत भिवंडी महापालिकेत सत्ता काबीज केली आहे. आगामी राजकारणात या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.