Sanjay Raut : काल ७ फेब्रुवारीला भाजपकडून मुंबई महापौर पदासाठी आक्रमक महिला नेत्या रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मुंबईच्या महापौर रितू तावडेच होणार हे निश्चित आहेत. केवळ मतदान होऊन औपचारिक घोषणाच बाकी आहे. आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडे यांनी मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल तर बांगलादेशी, रोहिंग्यांना इथून बाहेर काढावं लागेल, असे वक्तव्य रितू तावडे यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी समाचार घेत नवीन महापौरांना कडक शब्दांत सुनावले आहे. रितू तावडे काय म्हणाल्या होत्या? मुंबईच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. याविषयी बोलताना नव्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्यांनी! त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे. संजय राऊतांनी महापौरांना सुनावले संजय राऊत काय म्हणाले? महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेश मुक्त करण्याचे त्यांचे जे काही धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. त्या पुन्हा हिंदू-मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलावून काही उपयोग झालेला नाही, असा शब्दांत संजय राऊतांनी रितू तावडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकारवर साधला निशाणा यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर देखील गंभीर आरोप केले. बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, घरांची जाळपोळ आणि हत्या झाल्याचे नमूद करत, अशा स्थितीतही भारत सरकार बांगलादेशला कोट्यवधी रुपयांची मदत करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ही मदत हिंदूंच्या हत्यांना प्रोत्साहन देण्यासारखी आहे का, असा खोचक सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केला. हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा कार्यकाळ लवकरच संपवणार; पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार?