सातारा – सातारा जिल्हा स्व. यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना मानणारा आहे. हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा सत्तेच्या जोरावर सुरू असला तरी जिल्ह्यातील जनतेचा शरद पवारांवर विश्वास आहे. सध्या जे सुरू आहे, त्या अफवा असून जिल्ह्यात राष्ट्रवादी त्याच ताकदीने विधानसभा निवडणूक लढवेल, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, दोन वर्षांपासून मलाही ऑफर असून अनेकदा माझ्याशी चर्चा करण्याचाही प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा दि. 28 रोजी सातारा जिल्ह्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनातील बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहणार आहे. कुणाच्या जाण्याने पक्षाला फारसा फरक पडत नाही. काही जणांबद्दल पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
फोडाफोडीचे राजकारण फार काळ टिकत नाही. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे निवडून येऊ नयेत म्हणून युतीमधील अनेकांनी ताकद लावली. मात्र, उदयनराजेंना पराभूत करणे त्यांना जमले नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेऊन अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. माझ्यासह सगळ्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात यश मिळणार नाही. सध्या दिवस वाईट असले तरी कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ढळू देऊ नये.
सध्या सुडाचे राजकारण सुरू असून सत्तेचा गैरवापर होत आहे. जुनी प्रकरणे उकरून काढून त्रास देण्यात येत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर लोकशाहीला धोका आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस संपवणे सोपे नसून पक्ष आम्ही आणखी भक्कम करणार आहोत. जे पदाधिकारी पक्षाचा लाभ घेतात, पण पक्षवाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, त्यांचा विचार करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा दि. 28 रोजी दहिवडी येथे येणार असून दुपारी 2 वाजता सभा होणार आहे.
त्यानंतर ही यात्रा पुसेगाव, कोरेगावमार्गे सातारा येथे येणार असून सायंकाळी 5 वाजता कल्याण रिसॉर्ट येथे सभा होणार आहे. दि. 29 रोजी सकाळी 9 वाजता कराड येथे प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर 11 वाजता सभा होणार आहे. दुपारी 2 वाजता पाटण येथे सभा होणार आहे.