पंतप्रधान किसान मानधन योजना : मावळातील शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह
पिंपरी – देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी 15 दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा “श्रीगणेशा’ झाला. सर्व अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टरपर्यंतचे शेती असलेल्या शेतकरी लाभार्थी ठरू शकणार असले तरी प्रत्यक्षात या योजनेकडे मावळातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. आजपर्यंत अवघ्या 49 शेतकऱ्यांनीच सहभाग घेतल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
मावळ तालुक्यात एकूण 59 ठिकाणी “आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांमार्फत नोंदणी करण्यात येत आहे. या ठिकाणी नि:शुल्क नोंदणी करून शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र ग्रामीण भागात इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्यामुळे नोंदणीमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची सेवा केंद्र चालकांकडून देण्यात येत आहे.
पंतप्रधान किसान मानधन योजनेतील शेतकऱ्यांसाठी 9 ऑगस्टपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अल्प व अल्यल्प भूधारक शेतकरी व त्यांची पत्नी स्वतंत्र सहभागी होता येणार आहे. त्यांच्या वयाची 60 पूर्ण झाल्यावर दरमहा तीन हजार रुपये पेंशन मिळणार आहे. त्यासाठी 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षांपर्यंत वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल.
विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शेतकऱ्याचे 60 वर्षे वय पूर्ण होण्यापूर्वीच निधन झाल्यास त्याच्या 60 वर्षे वयापर्यंत उर्वरित मासिक हप्ते त्यांच्या पेंशन फंडामध्ये कुटुंबीय (पती किंवा पत्नी) भरून खाते सुरू ठेवू शकतात.
पेंशन खाते बंद करावयाचे असल्यास जमा केलेला हप्ते व्याजासह परत वारसदारांना दिला जातो.
याशिवाय काही कारणास्तव पेंशन फंडातून बाहेर पडावयास असल्यास फंडामध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह परत शेतकऱ्याला मिळते, तसेच 60 वर्षांपूर्वी शेतकऱ्याचे निधन झालेल्या शेतकऱ्याच्या पती-पत्नीस 50 टक्के रक्कम अथवा 1500 रुपये मासिक पेंशन दिली जाणार आहे, असे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
…अशी आहे योजना
-पंतप्रधान किसान मानधन योजना देशातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या दृष्टिने नऊ ऑगस्ट पासून योजनेस प्रारंभ
-अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी याकडे वृद्धावस्थेत खूपच कमी बचत असते किंवा कधी-कधी ती ही असत नाही, अशा वेळी पुढील जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच साधन नसते.
-या योजनेचा मूळ उद्देश असा आहे की, जेव्हा हे शेतकरी वृद्धावस्थेत जातील तेव्हा त्यांना अर्थसहाय्य करणे, त्यामुळे शेतकरी चांगल्याप्रकारे जीवन जगू शकतो.
-या योजनेतून पात्र लाभार्थ्याला दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती मानधन दिले जाईल
-ही ऐच्छिक आणि हप्ता आधारित निवृत्ती मानधन योजना आहे.
ही योजना भारतीय जीवन विमा निगम यांच्याद्वारे व्यवस्थापित केली असून, त्यांच्या वतीने चालविली जाणार आहे.
-अल्प व अल्यल्प भूधारक शेतकरी यांना 55 ते 200 रुपयांपर्यंत पेन्शन निधीमध्ये हप्ता जमा करावे लागेल. हा हप्ता वयाच्या 60 वर्षांपर्यंत (सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत) जमा करावे लागेल.
केंद्र सरकार लाभार्थ्यांने पेन्शन निधीमध्ये जमा केलेल्या रकमेइतकेच योगदान जमा करेल.
-अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पती-पत्नी हे या योजनेमध्ये स्वतंत्ररित्या भाग घेऊन 60 वर्षांनंतर दरमहा स्वतंत्रपणे तीन हजार रुपये पेन्शन घेण्यासाठी पात्र ठरतात.
-काही कारणास्तव एखाद्या सहभागी शेतकऱ्यास या योजनेतून बाहेर पडायचे असल्यास त्याने भरलेल्या निधीची रक्कम व्याजासह त्यास परत मिळते.
सेवानिवृत्ती पूर्वी एखाद्या सहभागी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास मृत शेतकऱ्याचा पती किंवा पत्नी सहभागी मृत शेतकऱ्याच्या 60 वर्षांपर्यंत निधी जमा करू शकतील. अथवा सहभागी मृत शेतकऱ्याच्या पती/पत्नीला ही योजना चालू ठेवावी वाटत नसेल, तर त्या मृत शेतकऱ्याने जमा केलेला निधी हा व्याजासह त्याच्या पत्नी/पत्नीस मिळतो.
-सेवानिवृत्तीपूर्वी सहभागी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती/पत्नीस 50 टक्के किंवा 1500 रुपये प्रतिमहिना मानधन मिळू शकते.
योजनेत सहभागी शेतकरी हा पी-एम किसान योजनेचा लाभार्थी जरी असला तरी या योजनेमध्ये लाभ घेण्यास तो पात्र राहिल. एकाच बॅंक खात्यात हे दोन्हीही लाभ घेता येतील.
-जे पात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात. त्यांनी आपले सरकार केंद्रावर (कॉमन सेवा केंद्र) जावून या योजनेत सहभागी होऊ शकतात.
आवश्यक कागद पत्रे : आधार कार्ड, बॅंक पासबूक, 7/12, 8 अ