राष्ट्रवादीच्या चार इच्छुकांची मातोश्री भेट; तर शिवसेनेकडून सहाजण इच्छुक
पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे; परंतु उमेदवारीची शाश्वती नसल्यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांकडून भाजपा-शिवसेनेमधून उमेदवारी मिळविण्यासाठी भेटी-गाठी सुरू झाल्या आहेत. काहींनी प्रवेशही केला.
युतीमध्ये सुरू असलेल्या या मेगाभरतीने दोन्ही विरोधी पक्षांना “घाम’ फुटला आहे. पुणे जिल्ह्यातही हीच परिस्थिती असून, आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या भोर-वेल्हे-मुळशीतही “खलबत’ सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या चार इच्छुकांनी तर घड्याळ सोडून मनगटावर शिवबंधन बांधण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी मातोश्रीही गाठली.
मागील विधानसभा निवडणुकीत भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात शिवसेनेने चांगलीच लढत दिली होती.
केवळ काही मतांच्या फरकाने शिवसेना दुसऱ्या स्थानावर राहिली; परंतु यावेळी या मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी पक्षाकडून सर्व ताकद पणाला लावली असून, शिवसेनेकडून सहा इच्छुकांनी पक्षप्रमुखांकडे उमेदवारी मागितली आहे. तर या मतदारसंघात “अपनी चलती है’ असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार इच्छुक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
त्यामध्ये दोन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून, दोन जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. या इच्छुकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भोर-वेल्हे-मुळशीत राष्ट्रवादीला पुन्हा “फटका’ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भगवा फडकविणारच
शिवसेनेकडून माजी सभापती बाळासाहेब पवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, उपजिल्हाप्रमुख बबनराव दगडे, माजी तालुका प्रमुख प्रकाश भेगडे, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे आणि दत्तात्रय टेमघरे हे इच्छुक आहेत. कुलदीप कोंडे यांना मागील विधानसभेत संधी दिली आहे. आमच्यातल्या कोणालाही संधी द्या; परंतु भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला पाहिजे, त्यासाठी आम्ही एकदिलाने काम करू अशी ग्वाही इच्छुकांकडून देण्यात आली आहे; मात्र ही एकी शेवटपर्यंत टिकणे आवश्यक आहे.
युती झाली तर जागा कोणाला?
विधानसभेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होणार का? यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील इच्छुकांनी “वेट ऍन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. काही इच्छुकांची नावे चर्चा आणि प्रसिद्धीमधून समोर आल्यामुळे पक्षाकडून त्यांना विचारणा करण्यात आल्यामुळे “आम्ही कुठेही जाणार नाही’ असे सांगितले; परंतु युतीचा निर्णय झाल्यावर तसेच उमेदवारी मिळण्याची शाश्वती मिळाल्यानंतर हे इच्छुक “उडी’ मारणार असल्याचे बोलले जात आहे. तसेही इच्छुक पक्षात जास्त सक्रीय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संधी मिळताच ते कोलांटउडी मारणार?