चिमुकल्यांना बळावताहेत पाठीचे आजार; अपेक्षीत वजनाच्या तिप्पट दप्तराचे ओझे
पिंपरी – शासनानेच नव्हे, तर न्यायालयानेही विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेल्या दप्तराच्या ओझ्याबाबत निर्देश दिलेले आहेत. असे असताना विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी व्हायला तयार नाही. अगदी, नर्सरीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट असल्याचे आढळून येत आहे.
यावर्षी शाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र नव्या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कायम राहीले आहे. पाठीवर असलेल्या भल्या मोठ्या ओझ्यामुळे चिमुकली मुले मात्र “वाकलेली’ दिसत आहेत.
पहिली पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वाढलेला शालेय अभ्यासक्रमामुळे काळानुरुप विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्ताराचे ओझेही वाढू लागले. त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांना पाठीचे अजार, मणक्याचा त्रास होवू लागला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी संशोधन केले. व 2015 मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या व शाळांना तशा सुचनाही दिल्या; मात्र त्यानंतरही खरेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्ताराचे ओझे कमी झाले का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या सूचना अमलात आणल्या जातात का? याची पहाणीही शासनाकडून अनेक शाळांमध्ये झालेली नाही. या शिवाय काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत; परंतु अनेक पालक याबाबत जागृत नसल्याने विद्यार्थ्यांचे दप्तर जड होत आहे. त्यामुळे, शासनाने उपाययोजना करुनही विद्यार्थ्यांना पाठीवर भलेमोठे ओझे घेवूनच या वर्षीही शाळेत जावे लागत आहे.
शासनाने सुचवलेल्या उपायांना शाळांकडून तिलांजली
शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांना उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यानुसार, दप्तराचे ओझे विद्यार्थ्याच्या वजनाच्या 10 टक्केपेक्षा जास्त असू नये. चित्रकला, हस्तकला, कार्यानुभव, संगणक या विषयाच्या वह्या शाळेत ठेवण्याची व्यवस्था करावी. शाळेत ग्रंथालयासारखे दप्तरालय सुरु करावे. तसेच पहिली आणि दुसरीसाठी गृहपाठ वह्यांची आवश्यक्ता नाही. तसेच इतरही अनेक उपाययोजना शाळांना सुचवल्या आहेत. मात्र, या उपाययोजनांना शाळा व मुख्याध्यापकाकडून सोयीस्कर रित्या तिरांजली दिली जाते.
कागदपत्री बनवला जातो अहवाल?
दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी ठेवण्याबाबत शाळांना सूचना देण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर सोपवून त्याचा अहवाल मागितला जातो; परंतु अधिकारी शाळांमध्ये जाऊन पहाणी करण्याऐवजी कागदोपत्रीच अहवाल तयार करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यात यश आलेले नाही.