सुरेश डुबल
शहरातील भाईगिरीशी क्लोज कनेक्शन; डांग-डिंग वाढल्याने प्रतिस्पर्धी टोळ्यांचा उपद्रव
वाढदिवसाला फुटकळ दादांचे फॅड
शहरात रात्री-अपरात्री वाढदिवस साजरे करणे, गर्दी जमवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. याचे लोण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. गावगुंडाचा वाढदिवस असल्यास शहरातील भाईंना बोलवण्याचे फॅड देखील आता वाढू लागले आहे. तो भाई देखील त्या दादाच्या वाढदिवसाला एकटा न जाता गल्ली गोळा करून घेऊन जात असतो. यातून गावात आपली हवा होत आहे, असे त्या फुटकळ दादांना वाटत असल्याने ग्रामीण भागात देखील अशा वाढदिवसांचे प्रमाण वाढले आहे.
कराड – वर्चस्ववादातून कराडमध्ये याआधी बरेच खटके उडाले. याला नेहमी टोळी युद्धाची किनार लागली. हे विषय फक्त शहरापुरतेच मर्यादित राहिले नसून आता वर्चस्ववादाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचले आहे. मागील इतिहास पाहता ग्रामीण भागातही भाई, दादा उदंड झाले आहेत. त्यांचे शहरातील भाईंशी क्लोज कनेक्शन झाले आहे.
जानेवारी 2009 साली महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. येथे वर्चस्ववाद कारणीभूत असल्याचे अधोरेखित झाले. संजय पाटील यांना संपवून सल्या चेप्याची टोळी प्रकाश झोतात आली. त्यानंतर सल्याची टोळी पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरू लागली. सल्याची डांग-डिंग वाढत गेल्याने प्रतिस्पर्धी टोळ्या निर्माण झाल्या. शहरासह ग्रामीण भागात ही गुन्हेगार मोठ्या प्रमाणात तयार झाले.
युवराज साळवे, दीपक पाटील, पिके यांच्या टोळीने सल्याच्या टोळीला संपवण्यासाठी त्याच्यावर हल्ले केले. या हल्ल्यात सल्या जायबंदी झाला. 2015 ला त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर युवराज साळवे टोळीने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ग्रामीण भागात दहशत पसरवली. हळूहळू ग्रामीण भागातील फुटकळ दादांनाही गुन्हेगारीची क्रेझ लागली. गुन्हेगारांशी हितसंबंध ठेवणे, त्यातून आपलाही दबदबा वाढवणे यासाठी ते शहरी गुंडाकडे आकर्षक झाले आहेत.
त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आहेत. त्यामुळेच गावात एखादा फुटकळ दादाचा वाढदिवसाला शहरातील भाईला बोलवणे, हे प्रकार ग्रामीण भागात नित्याचेच बनले आहेत.शहरी भाई ही शहरातून गाड्या भरून ग्रामीण भागात जावून हवा करत आहेत. त्यातून या भाई व दादांच्या गॅंगमध्ये सामील होण्याचे वीस-बावीस वर्षांच्या पोरांचे प्रमाण वाढते आहे. आपली मुलं काय करतात, कोणाबरोबर असतात, याची जराही माहिती घरच्यांना नसते. जेव्हा एखादा गुन्हा त्या मुलांच्या हातून घडतो, तेव्हा याबाबतची माहिती घरच्यांना मिळते. अशी स्थिती ग्रामीण भागात सर्रास पहावयास मिळत आहे.
भाईगिरीमध्ये पहिल्यांदा चाकू, सुरा, तलवारीने दहशत माजवली जायची. मात्र जसजसा काळ बदलला तसतसे गुंड ही हायटेक झाले आहेत. त्यामुळे आज शहर व ग्रामीण भागातील गावगुंडांच्या घराची झडती घेतली तर पिस्तूल, गावठी कट्टे यासारखी हत्यारे मिळतील. मात्र यासाठी पोलिसांना फक्त पोलिसिंग करणे गरजेचे आहे. पोलिसांनी किरकोळ गोष्टीत फुटकळ दादांना अभय दिल्याने गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील फुटकळ दादा शहरातील भाईंना हाताशी धरून दबदबा वाढवत आहेत.