आपणच प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी जोरदार खटाटोप
रेडा – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आजी-माजी आमदारांमध्ये पाण्यावरुन जुंपली असून याचा भाजप-शिवसेना लाभ उठवणार का? हे येणारा काळच स्पष्ट करेल मात्र, तोपर्यंत आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय चिखलफेक अनुभवयाला मिळणार आहे.
दरम्यान, शनिवारी (दि. 24) आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव घेता पाण्यावरुन चिमटा काढला होता. त्याला रविवारी (दि. 25) पाटलांनी उत्तर देत उत्तर दिले आहे. यामुळे आपणच इंदापूर विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असल्याचा खटाटोप भरणे-पाटलांकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतीला 20 वर्षे खडकवासला, नीरा डावा कालवा, शेटफळ तलाव, नीरा व भीमा नदीवरील बंधारे यांच्या पाण्याचे मी पदावर असताना उत्कृष्ट नियोजन केले, त्यामुळे 20 वर्षे शेतीला पाणी वेळेवर मिळत होते.
याउलट गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळू शकलेले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेती पाण्याअभावी अडचणीत सापडली आहे. तालुक्यातील शेतीच्या पाण्याअभावी झालेल्या दुरवस्थेला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता लगावला आहे.
मंत्रिपदाच्या काळात तुम्ही पाणीप्रश्न का सोडला नाही, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि. 24) इंदापूर विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांच्याचे नाव न घेता केली होती. या टीकेस हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणेंचे नाव न घेता केली.
सध्या सर्व धरणे भरलेली आहेत, पावसाळा संपत आला आहे, तरीही इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील सर्व तलाव, शेटफळ तलाव का भरले जात नाहीत तसेच सणसर कटमधून पाणी का येत नाही, याची जबाबदारी लोकप्रतिनिधींना टाळता येणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.