राज्याचे अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार Top 10 news: राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज 23 फेब्रुवारी ते 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अधिवेशन काळात शनिवार 28 फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. अधिवेशनादरम्यान सणासुदीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार नाही.तर यावेळी अधिवेशनात संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे. तसेच मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे. तर निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ देखील होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवयाने ठाकरेंच्या शिलेदाराचा राजीनामा नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यात शिवसेना (ठाकरे गटाला) एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. या सर्वंकष पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सोपवला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.शेखर घोसाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी त्यांच्या कष्टावर पाणी फेरले. तालुक्यातील सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी स्वतःला जबाबदार धरले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. डॉक्टरांनी शरद पवार यांना किमान पाच दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला असून, ते डॉक्टरांच्या सूचनेनुसार पूर्ण उपचार घेणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, छातीत कफ साचल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास तसेच बोलण्यास त्रास होत होता. मात्र, सध्या उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा करणार गेम? Top 10 news: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर साताऱ्याच्या गादीचा मान नेमका कुणाला मिळणार?कारण निकालानंतरच्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तेची गणितं गुंतागुंतीची झालीयत…जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी मॅजिक फिगर गाठताना भाजपची दमछाक होतेय…त्याचवेळी भाजपच्या विरोधात पडद्यामागे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्यात.. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20, शिंदेसेनेला 15 काँग्रेसला 1 तर अपक्षांना 2 जागा .. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र आल्यास 33 हा बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य आहे. त्यामुळं इथं कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं गरजेचं आहे. राम सातपुते यांच्या खुनाचा कट माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या खुनाचा कट रचण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. निवडणूक निकालाच्या दिवशीच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, दमबाजी करण्यात आली एवढेच नाही तर राम सातपुते यांच्या हत्येचा कट देखील रचण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.पोलिस तपासातून नक्कीच कोण काय करत आहे समोर येईल असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगरमधील सौंदाळा ‘जातमुक्त’ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने ‘जातमुक्ती’चा ऐतिहासिक निर्णय घेत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. सौंदाळा गावाने ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ करण्याचा ठराव मांडण्यात आला.जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर गावात कोणताही भेदभाव नको असं यात सांगण्यात आलं. त्यासोबतच आंतरजातीय विवाह मोठ्या थाटात लावले जातील, त्याला पूर्ण सामाजिक पाठिंबा असेल असेही या ठरावात मांडलं. जातीवाद पसरवणारे मेसेज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आणि ‘माझी जात – मानव’ हाच मंत्र आता प्रत्येक ग्रामस्थानं स्वीकारला आहे.खरतर सौंदाळा गाव हे काही पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाही. यापूर्वीही या गावाने शिवी बंदी, विधवा पुनर्विवाह आणि विद्यार्थी हिताचे अनेक पुरोगामी निर्णय घेतले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणे, सण-उत्सव, शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रमातून जातिभेद पूर्णपणे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय या गावानं घेतलाय. भारतात सोशल मीडिया वापरासाठी येणार वयाची मर्यादा ? मुलांमध्ये सोशल मीडियावरील वाढत्या डिजिटल व्यसनाबद्दल आणि त्यांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते लवू कृष्णा देवरायलू यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलंय. वय-आधारित सोशल मीडिया नियमनावर धोरणात्मक चर्चा करण्याची यातून त्यांनी मागणी केली आहे. पत्रात, खासदार देवरायलू यांनी भारतातील १४ ते १६ वयोगटातील जवळजवळ ९० टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहेत. ७५ टक्क्यांहून अधिक मुले सक्रियपणे सोशल मीडिया वापरत आहेत.याचाच विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यामुळं सरकारकडून कठोर पाऊल उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. अमेरिकेने भारताचा तो नकाशा हटवला Top 10 news: अमेरिका आणि भारत यांच्यात एक ऐतिहासिक व्यापार करार झाला, ज्याचे जगभरात पडसाद उमटले. त्यानंतर, अमेरिकेने यशस्वी व्यापार करार साजरा करण्यासाठी भारताचा नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशाने व्यापार करारापेक्षा जास्त लक्ष वेधले. हा नकाशा सर्वत्र व्हायरल झाला, ज्यामध्ये पीओके आणि अक्साई चीन भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले. तथापि, आता अमेरिकेने हा नकाशा हटवला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा जोरदार वादविवाद सुरू झाला आहे. ‘अमेरिकेने टॉयलेट पेपरसारखे वापरुन फेकून दिले’ पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा संदर्भ देत अमेरिकेवर तीव्र शब्दात टीका करत. पाकिस्तानने यापूर्वी घेतलेल्या विविध निर्णयांवर नाराजी देखील त्यांनी व्यक्त करत, पूर्वीच्या सरकारचाही समाचार घेतला. ‘इस्लामच्या रक्षणासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांत पाकिस्तानने सहभाग घेतला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धात जिहादच्या नावाखाली आपल्या लोकांना मारण्यात आले. पण, पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही’, असे मंत्री ख्वाजा आसिफ संसदेत बोलताना म्हणाले. अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी १९९९ नंतर पाकिस्तान पुन्हा युद्धात सहभागी झाला. याची मोठी किंमत भविष्यात पाकिस्तानला चुकती करावी लागली. झिया-उल-हक आणि मुशर्रफ यांच्यावर टीका करताना, ‘अमेरिकेने पाकिस्तानचा टॉयलेट पेपरसारखा वापर करुन फेकून दिले’, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.