जिल्हा परिषदा अन् पंचायत समित्यांमध्ये भाजपचं अव्वल Top 10 news: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं त्याचा निकाल काल हाती लागला. या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, तीन जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली. तर नगरपालिका आणि नगरपंचायत त्यापाठोपाठ महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकालात विजयाची हॅटट्रिक साधत भाजपच नंबर वनचा पक्ष ठरला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपनं पकड मिळवली असून विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत सपशेल पराभव स्वीकारावा लागला.या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिला आहे. यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतही विक्रमी जागा जिंकत भाजपने यशाचे शिखर गाठले होते. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारही दिल्लीत जाणार राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होतील. सुनेत्रा पवार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. दरम्यान, या त्यांच्य दिल्ली दौऱ्यामधे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील सोबत असणार आहेत. कोल्हापूरकरांची राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मते दिली आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा मिळाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेससाठी गुलाल हा दुरापास्त झाला होता. मात्र ही कसर भरून निघाली आहे असं म्हणावं लागेल. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसने बाजी मारली असून काँग्रेसने 15 जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज दिली आहे. दुसरीकडे पक्षीय बलाबलामध्ये महायुती एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेडपी अध्यक्ष निश्चित आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरकरांनी मतांमधून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमित शाहांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नाव घेणं टाळलं राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकालकाल जाहीर झाला. या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. महायुतीच्या या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर पोस्ट करत महायुतीचं कौतुक केलं आहे. मात्र या पोस्टमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव घेतलं नसल्याचे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद निकालात एनडीएचं अभिनंदन करताना केवळ भाजप आणि शिवसेनेचा अमित शाह यांनी उल्लेख केला आहे. अमित शाह यांनी अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव घेणे टाळले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खानापुरात शिंदेंच्या आमदाराने भाजपचा धुव्वा उडवला Top 10 news: ‘मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे’ अशा शब्दात भाजपला आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी त्यांचा गड राखला आहे. सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा सुपडासाफ केल्याचं दिसून आलं. खानापुरातल्या जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिवसेनेने जिंकल्या असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या सुहास बाबरांनी त्यांचा करिश्मा कायम ठेवला. जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 ही जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. साताऱ्यात शिंदेसेना ठरली किंगमेकर सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांपैकी 27 जिल्हा परिषद गटात भाजपनं विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला तर इतरांनी 2 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळं साताऱ्यात त्रिशंकू चित्र निर्माण झालं आहे. साताऱ्याच्या सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार? का असा सवाल निर्माण झाला आहे. भाजप 27 जागेवर विजयी होऊन मोठा पक्ष असला तरी सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षातल्याच पक्षांची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजयी तर शिवसेना 15 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा राष्ट्रवादी शिवसेनेकडे असल्याने भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यात येईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे. 8 लाखांची लाच घेताना PWD उपअभियंता रंगेहात अटक विद्युत ठेकेदाराकडून बिलाच्या मोबदल्यात 8.50 लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 8 लाख रुपये स्वीकारने उपअभियंत्याला चांगलंच महागात पडलं. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत उपविभागाचा उपअभियंता नितीन इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी करण्यात आली. या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले होते. संबंधित प्रकरणात बिल अदा करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती. अनिल अंबानींच्या चौकशीसाठी ईडीचे तपास पथक स्थापन Top 10 news: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप आणि त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांविरुद्ध 40 हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची निष्पक्ष आणि जलद चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ED ने सोमवारी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले, परंतु त्या हजर राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांना पुन्हा समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. रिलायन्सचे वरिष्ठ कार्यकारी आणि अंबानी यांचे जवळचे सहकारी पुनीत गर्ग यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. कोठडीतील चौकशीदरम्यान, गर्ग यांनी टीना अंबानी यांचे नाव घेतले. त्यामुळे टीना अंबानी यांची न्यू यॉर्कमधील मॅनहॅटनमधील 70 कोटींच्या अपार्टमेंटच्या खरेदीशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकन राजदूतांकडून भव्य पार्टीचे आयोजन भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी त्यांच्या निवासस्थानी एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये राजनैतिक समुदाय, व्यावसायिक क्षेत्र आणि भारत-अमेरिका या दोन्ही देशांतील प्रमुख भागीदार उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन आणि भारतातील युरोपियन युनियनचे राजदूत हर्वे डेल्फिन हे देखील गोर यांच्या निवासस्थानी झालेल्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. गोर यांनी भारत-अमेरिका भागीदारीच्या अफाट क्षमतेबद्दल सांगितले. तसेच त्यांनी एस. जयशंकर, पियुष गोयल आणि ७५ हून अधिक राजदूतांचे आभार मानले. भारत-पाकिस्तान T20 WC सामना होणार क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताविरूद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला होता. पण आता ८ दिवसांतच पाकिस्तानचं डोकं आयसीसीने ठिकाण्यावर आलं असून पाकिस्तान सरकारने माघार घेतली आहे. यासह आता भारत-पाकिस्तान संघांमधील हायव्होल्टेज लढत येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताविरुद्ध सामना खेळण्याच्या सूचना दिल्या केल्या आहेत. सरकारने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली.