सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा Top 10 news: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशी चर्चा रंगली होती. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळालीय. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पहिला ठराव पुण्यातून एकमताने मंजूर झाला आहे. अध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झालीय.राष्ट्रवादीच्या घटनेतील संबंधित तरतुदींनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले तर पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला योग्य ठरावाद्वारे नवीन अध्यक्ष निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या पदावर निवड करावी, असा पहिला ठराव पुण्यात मंजूर करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं -सुनील तटकरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार आणि नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी ह्या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तसेच अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, असंही सुनील तटकरे म्हणाले. युरोपीयन कंपनीकडे तपास दिला होता का? कुणी फोन केला? ते मला माहिती नाही. त्यांनी कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकर असल्याने त्यांच्याकडे अधिक माहिती असेल, असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांना टोलाही लगावला. रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा. तर मला उत्तर देता येईल. असंही त्यांनी यावेळी म्हटलं. राज्यात थंडी ओसरली, उन्हाचा तडाखा वाढला राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून उन्हाच्या तडाखा वाढू लागला आहे. आज राज्यात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर तापमानात वाढ होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, गुरुवार (१२ फेब्रुवारी २०२६) रोजी मुंबईत आकाश मुख्यतः निरभ्र राहील.कोकणातील जिल्ह्यांमध्ये तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. काही भागांत तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, जे सामान्यपेक्षा जास्त आहे. यामुळे कोकणवासीयांना उकाड्याचा सामना करावा लागेल.तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने सूर्यप्रकाशित आणि कोरडे हवामान राहील. किमान तापमानात येत्या ३ दिवसांत १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. माझ्या स्थानकामध्ये तथ्य -अमोल मिटकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा खळबळजनक संशय अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. नंतर आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील रोहित पवारांच्या संशयावरती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.अमोल मिटकरी यांनी याबाबतची एक पोस्ट सोशल मिडीयावरती शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नुकतच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. माननीय मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही”, असंही त्यांनी पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे. सातारा झेडपीतील सत्तेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेच घेणार निर्णय Top 10 news: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तास्थापनेसाठी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही त्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी “निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा.एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप. मात्र, बेरीज काय झाली, अति तिथे माती होते. अति जाऊन कुठे केलं तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात, असे शंभूराज देसाईंनी म्हटले. शंभूराज देसाईंनी नाव न घेता भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. कॉपी पुरवणाऱ्या अधिकारी, पर्यवेक्षकांवर कारवाई राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानास पहिल्याच दिवशी हरताळ फासण्यात आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यंवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश दिले असताना आता, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. कॉपी करणाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि पालकांवरही कारवाई केली जाईल. ज्या शाळांनी पालन केले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. जमीन मालकांसाठी सरकारचा मोठा निर्णय राज्यातील जमीन मालक आणि घर बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महायुती सरकारने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता तुमची जमीन अकृषक म्हणजेच एनए करण्यासाठी तुम्हाला सरकारी कचेऱ्यांमध्ये हेलपाटे मारण्याची किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीसाठी वाट पाहण्याची गरज उरणार नाही. सरकारने ही जुनी आणि क्लिष्ट पद्धत मोडीत काढली असून जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे.या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणारी स्वतंत्र एनए परवानगी इतिहासजमा झाली आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या जमिनीवर बांधकामासाठी एखादा आराखडा किंवा नकाशा मंजूर करून घेता, तेव्हा ती मंजुरीच तुमची अधिकृत एनए परवानगी असल्याचे मानले जाईल. जमीन मालकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आता दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर सरकारने रद्द केला आहे. पूर्वी हा कर भरण्यासाठी आणि त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरातून विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार आज या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. बंदमुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिलाय. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे. बांगलादेशमध्ये मतदानाला सुरुवात बांगलादेशमध्ये अनेक महिन्यांच्या हिंसाचार, रस्त्यावरील निदर्शने आणि राजकीय गोंधळानंतर, अखेर निवडणुकांची वेळ आलीय. २०२४ च्या सत्तापालटानंतर आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीनंतर, बांगलादेशात आज निवडणुका पार पडत आहेत. आज सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे. ही एक अशी निवडणूक आहे जी केवळ त्याच्या लोकशाहीची ताकदच नाही तर त्याच्या राष्ट्रीय ओळखीची दिशा देखील ठरवेल. भारत, चीन आणि पाकिस्तान या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत कारण ती पश्चिम आशियातील राजकीय संतुलन पुन्हा परिभाषित करू शकते. बांगलादेशमधील निवडणुकीत जमात-ए-इस्लामी बांगलादेश आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्यात चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. अर्ध्याहून अधिक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. दिव्या शिंदेंचा बिग बॉसवर हल्लाबोल Top 10 news: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरातून ज्या ‘तलवार’ प्रकरणाने एक्झिट झाली, त्या वादाने आता एका वादळाचं रूप घेतलं आहे. शोमधून नबाहेर पडल्यानंतर तिने पत्रकार परिषद घेऊन थेट निर्मात्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पत्रकार परिषदेत दिव्याचा एक वेगळाच आक्रमक आणि करारी बाणा पाहायला मिळाला. . ती म्हणाली, “मी जे बोलले त्याची जबाबदारी मी ठामपणे घेतेय आणि मरेपर्यंत घेत राहिन. जर संपूर्ण महाराष्ट्राला मी चुकीची वाटत असेन, तर मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही यावर मी ठाम आहे. मला जर शिक्षा देत असाल, तर शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा, पण मी अपमानाला सामोरी जाणार नाही. मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेतेय. शोमध्ये मला पूर्ण बोलू दिलं नाही. तरीही मी एक्सप्लेन करत राहिले.” अपमानापेक्षा मृत्यू पत्करण्याची तिची ही भाषा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.