कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर… Top 10 news: राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याने सध्या राज्यात वादाची ठिणगी पेटलीय. कुंभमेळ्यात लक्ष ठेवा. हिंदू सोडून कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, असे त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. नाशिकमध्ये बोलताना नितेश राणेंनी हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी खारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती. तेव्हा मी बोललो, नंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही आता ही काही वाटत नाही. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत नाही बोलायचे का? मग पाकिस्तान, इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात त्यांनी येऊन सांगावे.” असेही त्यांनी म्हटलं. युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला आखाती देशांमधील युद्धाचा थेट परिणाम शेती क्षेत्रावरही पडू लागला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेतीसाठी लागणाऱ्या विविध सिंचन साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कच्चे तेल रिफायनरी करताना त्यातून निघणाऱ्या घटकातून सिंचनचे पाईप निर्मिती होते. या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्याने तृषार सिंचन, ठिबक सिंचन संच, पीव्हीसी पाईप, मोटार पंप तसेच, मोटरपंप केबल यांच्या किमतीत तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची तयारी करत असताना अचानक वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांनाचे नियोजन विस्कळीत झाले. शेतकऱ्यांना हे साहित्य घेताना आता अतिरिक्त 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातील मोठी गुंतवणूक होत आहे. वारी एनर्जी लिमिटेड कंपनीने नागपूरच्या बुटीबोरी नवीन औद्योगिक परिसरात भारतातील सर्वात मोठे 10 गिगावॅट क्षमतेचे एकात्मिक सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. सौर इनगॉट आणि वेफर हे सोलर पॅनल तयार करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे पार्ट्स आहेत. हे पार्टस आजवर चीनमधून आयात करावे लागत होते. मात्र पहिल्यांदाच त्याचे भारतात उत्पादन सुरू होत आहे. नुकतच या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे नागपुरात हजारो रोजगार निर्माण होणार असून नागपूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार, असा दावा करण्यात येत येतोय. साताऱ्यात बळीराजा संकटात कडाक्याच्या उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात आला आहे. साताऱ्यात शनिवारी रात्री आणि सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारांच्या पावसाने काढणीला आलेले ज्वारी आणि गव्हाचे पिक पाण्यात गेलं अन् शेतकरी राजा कोलमडला. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सातारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय आहे. जावळी तालुक्यात गारांचा पाऊस झालाय. रानगेघर, करंदी आणि मेढा परिसरात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारीचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. शेतात काढणीसाठी तयार असलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकाला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. साईंबाबांच्या प्रसादालयाच्या प्रसाद वितरणावर निर्बंध आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून देशभरात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या परिस्थितीचा परिणाम आता धार्मिक स्थळांवरही दिसून येत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात गॅस बचतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रसादालयाच्या मेन्यूमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शिर्डीतील साई प्रसादालयात दररोज हजारो भाविकांसाठी भोजन तयार केलं जातं. तसेच भाविकांना मोफत दिल्या जाणाऱ्या बुंदी लाडू प्रसादाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते. मात्र गॅस टंचाईची शक्यता लक्षात घेता संस्थान प्रशासनाने प्रसाद वितरणावर काही मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फक्त एकच बुंदी लाडू प्रसादाचे पॅकेट देण्यात येणार आहे. यापूर्वी भाविकांना प्रसाद अधिक प्रमाणात उपलब्ध होत होता. मात्र गॅस बचत आणि प्रसादाची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात या ठिकाणी पावसाचा इशारा राज्यात उन्हाच्या कडाक्यासोबत काही भागांत पावसाळी वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून अमरावती येथे देशातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आज विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज अकोला, अमरावती येथे उष्ण लाटेची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? Top 10 news: अमेरिका-इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणध्ये आयतुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत मोठा दावा केलाय. मोजतबा खामेनी हे जिवंत नाहीत, असं मोठं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. तसेच मोजतबा खामेनी हे जिवंत असतील तर त्यांनी शरण यावे, असं आव्हान देखील त्यांनी दिलंय. इराण आता तडजोडीची भाषा करत आहे. मात्र, आम्ही इराणशी कोणत्याही अटीशर्थींशी तडजोड करण्यास तयार नाही, असे देखील ट्रम्प म्हणालेत. अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं आहेत कारण अमेरिका इराणमध्ये लष्कर घुसवणार आहे. त्यासाठी अमेरिकेनं आता आपली सर्वात अत्याधुनिक USS त्रिपोली लायटनिंग कॅरियर ही विध्वंसक युद्धनौका इराणच्या दिशेनं रवाना केलीय. पहिल्यांदाच अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवून हवाई, समुद्र आणि जमिनीवरुन इराणवर हल्ले चढवण्याच्या तयारीत आहे. USS त्रिपोली लायटनिंग कॅरियर ही अत्याधुनिक विध्वंसक युद्धनौका मानली जाते. समुद्रातून थेट जमीनीवर हल्ला करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. विशेष म्हणजे या युद्धनौकेवर अडीच हजार कमांडो, रडारपासून बचाव करत टार्गेटवर हल्ला करणारे स्टेल्थ फायटर जेट्स आणि अॅम्फीबियस क्षमता असलेली जहाजं आहेत. दुसरीकडे इराणच्या लष्कर प्रमुखांनी हिंद महासागरात अमेरिकेनं बुडवलेल्या जहाजाचा बदला घेण्याचा निर्धार केलाय. इराणच्या अनेक जहाजांना याच युद्धनौकेनं घेरलं.मात्र त्यानंतरही इराण काही थांबत नाही. त्यामुळे आपली नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेनं आपली आणखी विध्वंसक आणि अत्याधुनिक USS त्रिपोली लायटनिंग कॅरियर आणि सैन्य पाठवलंय.मात्र अमेरिकेच्या या युद्धनौकेला रोखण्यात इराण यशस्वी होणार की इराणच्या जमिनीवर युद्ध पेटणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट २८ फेब्रुवारीपासून सुरु असलेले इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचे युद्ध अजूनही काही संपण्याचे नाव घेत नाही.आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशलमीडियावरून पोस्ट करुन इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं ज्यांचं नुकसान झालं त्या देशांना युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक देश ज्यांच्यावर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केल्यानं परिणाम झाला आहे. त्या देशांनी युद्धनौका पाठवाव्यात. अमेरिकेसोबत आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आणि खुली ठेवण्याचं काम करु, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही इराणचं लष्करी सामर्थ्य 100 टक्के संपवलं आहे. मात्र,एखादा ड्रोन हल्ला करणं, बॉम्बचा मारा करणं आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा करणं सोपं आहे. इराण वाईट पद्धतीनं पराभूत झालेला आहे. मला अपेक्षा आहे, चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, यू.के आणि इतर देश होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळं प्रभावित झाले आहेत त्यांनी युद्धनौका पाठवाव्यात, असं ट्रम्प म्हणाले. तोपर्यंत अमेरिकेकडून इराणी बोटींवर हल्ले सुरु आहेत. तुम्हाला लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित,खुली झालेली मिळेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं. आता ट्रम्प यांच्या आवाहनाला हे देश कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल. बादशाहला बिश्नोई गँगकडून धमकी Top 10 news: बॉलीवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर बादशाह पुन्हा एकदा वादात सापडलाय. हरियाणा पोलिसांकडून कारवाईची शक्यता व्यक्त होत असतानाच आता कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगकडून बादशाहला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून ही धमकी देण्यात आल्याचा दावा केला जातोय. पोस्टमध्ये संबंधित लोक हवाला व्यवहारांद्वारे देशातील पैसा परदेशात पाठवत होते आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होत होते. या लोकांना आधी फोन करून इशारा दिला होता, मात्र त्यांनी तो गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आजची घटना ही फक्त ‘ट्रेलर’ असून पुढे अजून मोठी कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. याच पोस्टमध्ये सिंगर बादशाहलाही थेट धमकी देण्यात आली आहे. “सिंगर बादशाह, तू हरियाणाची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहेस. 2024 मध्ये तुझ्या क्लबमध्ये तुला ट्रेलर दाखवला होता. पुढच्या वेळी थेट तुझ्या कपाळावर गोळी मारू,” असा इशारा पोस्टमध्ये देण्यात आला आहे. दरम्यान, हरियाणातील पानिपतमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेताना बिश्नोई गँगने ही धमकी दिल्याचा सांगितलं जातंय.