भाषेसाठी हिंसा सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर Top 10 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी सक्तीच्या मुद्द्याची चर्चा होताना दिसत आहे. मराठी बोलणार नाही, असं म्हणायची कुणाची हिंमत कशी होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलताना, “एक तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रात परप्रांतीयांनी राहू नये किंवा अमुकच लोकांनी इथे राहावं अशी संकुचित वृत्ती महाराष्ट्रानं कधीच पाळली नाही. आणि भाषेबाबत बोलायचं तर स्वभाषेचा, मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे. मला नक्कीच असं वाटतं की जे लोक महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत, ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाहीत, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कुणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही.असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून ‘खळ्ळखट्याक्’ करणाऱ्या मनसेला उत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप बुलढाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या ९० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेत सामूहिक राजीनामे दिले. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज सायंकाळी मोठा राजकीय पेच निर्माण झाला. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मकरंद पाटील बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सायंकाळी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच ९० हून अधिक बड्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपले राजीनामे सादर केले. या सामूहिक राजीनाम्यांमुळे नियोजित बैठक रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर ओढवलीय. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक आजपासून सुरु होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले असून, या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.मिसिंग लिंक जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे. शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकासावर आणि पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने भाष्य केलं. महाराष्ट्र राज्य हे 2029 मध्ये ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असलेलं राज्य असेल, महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, असेही फडणवीसांनी सांगितले.आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’ मध्ये आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विकासकामांचे श्रेय सगळ्यांचे असल्याचे सूचवले. आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमच्याच काळात पूर्ण होत आहेत, आमच्या श्रेयवादाचे कारण नाही. आम्ही इन्फ्रा फॅमिली आहोत, त्यामुळेच आमच्यात कुठलाही श्रेयवाद नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार Top 10 News : इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा 2026 चा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाउनलोड करता येईल तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ती महत्त्वाची ठरणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा विविध रंगबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुणे येथील भाविकांनी ही फुलांची सेवा अर्पण केली आहे.या सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे.सजावटीसाठी शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, रॉकेट, ब्लू डीजी अशा देशी विदेशी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त युवराज सोनार, विजय सोनार, दादासाहेब पोकळे आणि सचिन चव्हाण यांच्याकडून ही फुलांची सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करण्यात आली आहे. LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण होताच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ मे २०२६ म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झाली असून, १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.१९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर एकाच वेळी ९९३ रुपयांनी वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे आणि नाशिकसह मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता ३,००० रुपयांच्या पार गेली आहे. ‘होर्मुझ’साठी अमेरिकेची नवी आघाडी? होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्यासाठी अमेरिका ‘मॅरिटाइम फ्रीडम कन्स्ट्रक्ट’ नावाची नवी आंतरराष्ट्रीय आघाडी तयार करण्याच नियोजन करत असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलीय. तेलपुरवठा सुरळीत नसल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे पाऊल उचललय. ‘होर्मुझ’ बंद असल्यानं जगातील एक पंचमांश तेल आणि गॅसपुरवठा विस्कळीत झालाय. जागतिक ऊर्जाबाजारातील किमती वाढल्यामुळे चिंता निर्माण झालीय. अमेरिकेने नौदल नाकेबंदी केल्याच्या निषेधार्ह इराणनं सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केलीय. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर नव्यानं हल्ले सुरू करण्याच्या विचारात असल्याच ‘ॲक्सिऑस’ या संकेतस्थळानं माहिती दिलीय. गुजरातकडून आरसीबीचा पराभव आयपीएल 2026 च्या 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 4 गडी राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान अधिक मजबूत केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचे 156 धावांचे आव्हान सहज पेलले. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी यशस्वी पाऊल टाकलंय. या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत महत्त्वाची झेप घेतली आहे. 9 सामन्यांत 5 विजय आणि 10 गुणांसह गुजरात सध्या पाचव्या स्थानावर आहे आणि टॉप-4 मध्ये प्रवेशासाठी जोरदार स्पर्धेत आहे. दुसरीकडे, आरसीबी 9 सामन्यांत 6 विजयांसह 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ‘नमन तुला’…अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज Top 10 News : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘नमन तुला’ हे रिलिज झाले आहे. हे गौरव गीत आणि अभिमान गीत आहे. भूषणकुमार आणि टी-सिरिजची ही प्रस्तुती असून, छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिवादन आहे. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या हृदयाला स्पर्श करणारे हे गीत असून, पारंपारिक महाराष्ट्रीय वेषात ते चित्रीत करण्यात आले आहे. शक्ती हसीजा यांनी हे गीत दिग्दर्शित केले आहे. नचिकेत बर्वे यांनी वेशभूषा डिझाईन केली आहे. पवन बॉब यांनी कोरिओग्राफी केली असून, अभिनेता रितेश देशमुख सुद्धा यात सहभागी आहेत. अनु मलिक यांनी संगीत दिले असून, पारंपारिक पोवाडे, आधुनिक ध्वनी यांचा सुरेख मेळ त्यात आहे. यात महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा अभिमान जागृत केला आहे.