Top 10 News : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर निर्णय, “मी एक इंचही मागे हटणार नाही” आणि कॉलेजमधील जातीय भेदभावावर ‘जयंती २’चा प्रहार, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर निर्णय
आज सर्वोच्च न्यायालयात दुपारी २ नंतर सुनावणी
Top 10 News : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद पूर्ण केला असून, आजपासून शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल बाजू मांडतील. ठाकरे गटाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. पक्ष आणि चिन्ह कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत वकील आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. पक्षांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी कामत यांनी केली. निवडणूक आयोगाचा निर्णय विधिमंडळ बहुमतावर आधारित असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.
मी एक इंचही मागे हटणार नाही’;
जरांगेंचा सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असूनही ते आंदोलनावर ठाम आहेत. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या नेतृत्वाखालील शासकीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चेसाठी दाखल झाले. यावेळी जरांगे भावूक झाले. मागण्या राज्यस्तरीय असल्याने अधिकाऱ्यांनी वेळ वाया घालवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील आणि मकरंद पाटील यांचे शिष्टमंडळही अंतरवलीत येण्याची शक्यता आहे.
तटकरेंच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का!
व्याही संतोष पोटफोडे शिंदेंच्या शिवसेनेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांचे व्याही आणि रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे रोहा शहराध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक मयूर पायगुडे, युवक शहराध्यक्ष सागर भोबड यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोह्यातील या पक्षबदलामुळे राष्ट्रवादीला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे.
सुट्या खाद्यतेलाच्या बंदीला वर्षभराची स्थगिती;
फडणवीसांचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या FDAच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला आहे. सुट्या तेल विक्रेत्यांना नियमांनुसार व्यवसाय पद्धतीत बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात आला आहे. या काळात व्यापाऱ्यांवर थेट कठोर कारवाई केली जाणार नाही. FDA आणि व्यापारी प्रतिनिधींच्या दोन संयुक्त समित्या स्थापन करून पारंपरिक व्यापाऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास आणि आवश्यक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. समित्यांचा अहवाल एका महिन्यात सरकारला सादर केला जाणार आहे. राज्यात २,१०३ परवानाधारक खाद्यतेल व्यापारी असून, त्यापैकी ३७० जणांकडे पुनर्पॅकेजिंगचा परवाना आहे.
विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा इशारा!
१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट Top 10 News :
राज्यात मान्सूनचा जोर ओसरला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने आज संपूर्ण विदर्भासह नांदेडला विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात हलक्या सरी पडू शकतात. मंगळवारी सोलापुरात राज्यातील सर्वाधिक ३३.७ अंश तापमानाची नोंद झाली. विजांचा कडकडाट होताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राहुल गांधींना ‘सद्बुद्धी’ मिळावी म्हणून यज्ञ;
देहरादूनमध्ये भाजपकडून ‘बुद्धी शुद्धी’चा कार्यक्रम
देहरादूनमध्ये राहुल गांधींना सद्बुद्धी मिळावी, यासाठी ‘बुद्धी शुद्धी यज्ञ’ करण्यात आला. देवळात राहुल गांधींची छायाचित्रे समोर ठेवून हा यज्ञ आयोजित करण्यात आला. भाजप एसी मोर्चाचे प्रवक्ते जयपाल वाल्मिकी यांनी राहुल गांधी केंद्र सरकारविरोधात सातत्याने बोलत असल्याचा आरोप करत, त्यांनी सकारात्मक राजकारणाच्या वाटेवर जावे, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी दौऱ्यानंतर झालेल्या कथित शुद्धीकरणावरूनही वाद निर्माण झाला होता. राहुल गांधींनी या प्रकरणी १९ जिल्ह्यांत तक्रारी दाखल केल्या आहेत. आता नव्या यज्ञामुळे राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
हवाई दलात शक्ती शर्मा यांची ऐतिहासिक झेप!
एअर व्हाइस मार्शल पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
हवाई दलातील अधिकारी शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शल पदावर नियुक्ती झाली आहे. संरक्षण दलांमध्ये वैद्यकीय पदे वगळता एअर व्हाइस मार्शल किंवा समकक्ष पदावर पोहोचणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंगळवारी त्यांनी हवाई दलाच्या मुख्यालयातील प्रमुख (शिक्षण) पदाची सूत्रे स्वीकारली. १८ जून १९९४ रोजी त्यांनी हवाई दलाच्या शिक्षण विभागातून कारकिर्दीला सुरुवात केली. विविध प्रशिक्षण संस्था, हवाई तळ आणि मुख्यालयात त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कपूरथळा सैनिक स्कूलच्या प्राचार्या म्हणूनही त्यांनी काम केले असून, आयआयटी कानपूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हवाई दलाचे अध्यासन स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला.
होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!
ट्रम्प यांचा दावा; ‘इराणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होत असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चेची किंवा कराराची शक्यता नाकारली. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने जॉर्डन, बहरीन आणि इराकमधील अमेरिकन तळांवर प्रतिहल्ले केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, होर्मुझमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी प्रति बॅरल चार डॉलरहून अधिक वाढल्या. इराणने मात्र अमेरिकेचा नियंत्रणाचा दावा फेटाळला आहे. ट्रम्प यांनी इराणच्या जनतेला सरकारविरोधात एकत्र येण्याचे आवाहनही केले.
अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर;
संजू सॅमसनचे पुनरागमन, बुमराहसह चौघांवर फिटनेसची अट
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, तर तिलक वर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून वगळलेल्या संजू सॅमसनचे संघात पुनरागमन झाले आहे. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांचाही संघात समावेश आहे. जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांची निवड फिटनेसच्या अधीन आहे. मालिकेतील सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबरला दिल्लीत खेळवले जाणार आहेत.
कॉलेजमधील जातीय भेदभावावर ‘जयंती २’चा प्रहार;
११ सप्टेंबरला महाराष्ट्रभर होणार प्रदर्शित Top 10 News :
कॉलेजमधील रॅगिंग आणि जातीय भेदभावावर भाष्य करणारा ‘जयंती २’ हा मराठी चित्रपट ११ सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा प्रभावी ट्रेलर प्रदर्शित झाला. चंद्रपूरहून उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या पायल या तरुणीची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला रॅगिंग आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर तिच्या संघर्षाची कहाणी पुढे सरकते. ऋतुराज वानखेडे, पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी आणि देविका दफ्तरदार यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. शैलेश बळीराम नरवाडे यांनी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.





