Top 10 News : आता शरद पवार गटात राजकीय भूकंपाचे संकेत, “तिघांचे बळी देऊन ‘शेंबड्या पोराला’ आमदार केलं”आणि ‘हे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत…’, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'ने ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर फुटीचे संकेत देणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

आता शरद पवार गटात राजकीय भूकंपाचे संकेत
दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं Top 10 News :
Top 10 News : एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर फुटीचे संकेत देणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या दोन मतप्रवाह आहेत. पक्षातील एका गटाकडून सध्याची पक्षाची परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी भूमिका घेतली जात आहे. तर पक्षातील दुसऱ्या गटाची एनडीएसोबत जाण्याची भूमिका आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात या दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचे समजते. त्यामुळं आता भविष्यात पक्षाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं गरजेचं आहे.
“तिघांचे बळी देऊन ‘शेंबड्या पोराला’ आमदार केलं”
शिंदेसेनेकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदार संघातील दौरे संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, “लायकी नसली तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे, ही शाहसेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे,” असा टोला लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदे यांना संधी मिळण्याच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले. याला प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. “श्रीकांत शिंदे हे तीन वेळा लाखोंच्या मतांनी निवडून आलेले खासदार आहेत. मात्र तुमच्या ‘शेंबड्या पोराला’ आमदार करण्यासाठी सुनील शिंदे, सचिन अहिर आणि किशोरी पेडणेकर यांसारख्या कार्यकर्त्यांचा बळी दिला,” असा आरोप करत त्यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली.
कर्जमाफीसाठी कृषिमंत्र्यांकडून आता नवी डेडलाईन
सरकारचा पहिलाच वादा फसला
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठी बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून तारखांचा खेळ खेळला जातोय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ संकल्पावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली होती, मात्र आता सरकारची ही डेडलाईन हुकली आहे. आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसाठी नवी तारीख जाहीर केली आहे. विधानसभेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी निधी दिला जात नसल्याचा मुद्दा भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी नव्या तारखेची घोषणा केली आहे. राज्यपालांच्या सहीचे कारण देत प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेळ लागणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभेत दिलीय. शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना ५ जुलैपासून मिळेल, अशी महत्वपूर्ण महितीही त्यांनी यावेळी दिली.
HSRP नंबर प्लेट बसवण्याचा आजचा शेवटचा दिवस ;
1 जुलैपासून वाहनचालकांना दंड
महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची अंतिम मुदत आज संपत आहे. त्यामुळे वाहनधारकांकडे आता केवळ एकच दिवस शिल्लक आहे. 1 जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार पोलीस आणि परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा वाहनांची आरटीओमधील हस्तांतरण, पत्ता बदल, वाहनावरील कर्जबोजा नोंदविणे किंवा हटविणे, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण यांसारखी कामेही रोखली जाणार आहेत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट सध्या लागू राहणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट
साहिल गोयलभोवती तपासाची चक्र फिरणार Top 10 News :
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासाची दिशा आता सियाचा भाऊ साहिल गोयलकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. क्रिकेटच्या माध्यमातून साहिल आणि चेतन चौधरीची मैत्री झाली होती, अशी कबुली साहिलने दिली आहे. त्यानंतर सिया आणि चेतनची ओळख होऊन त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्यामुळे या नात्याची साहिलला आधीपासून माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. सियाचा फेब्रुवारीत केतन अग्रवालसोबत साखरपुडा झाला होता, मात्र तिला हे लग्न नको असल्याचे तिने साहिलला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. बालीला प्री-वेडिंग शूटसाठी निघताना सिया आणि साहिलमध्ये वाद झाला होता का, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, सिया आणि चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
निर्णयानंतर आरोपीला प्रत्यक्षात कधी लटकवणार?
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. मात्र शिक्षा जाहीर झाल्याने तत्काळ फाशीची अंमलबजावणी होत नाही. कायदेशीर प्रक्रियेनुसार उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच दयेच्या याचिकांसह अनेक टप्पे पूर्ण करावे लागतात. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी होण्यासाठी साधारण 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकतो. यापूर्वी निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी सात वर्षे लागली होती, तर 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला शिक्षा सुनावल्यानंतर चार वर्षांनी फाशी देण्यात आली होती. कांबळेचे वय 65 वर्षे असल्याने शिक्षा अंमलात येण्यापूर्वी कारागृहात त्याचा नैसर्गिक मृत्यू होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असे एका विधिज्ञांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय;
१ जुलैपासून होणार लागू
आखाती देशांतील तणावामुळे गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आणि महागाई वाढली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक इंधन खरेदीवर तात्पुरते निर्बंध लागू केले होते. मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याने सरकारने हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 जुलैपासून देशभर लागू होणार आहे. यापूर्वी व्यावसायिकांना निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल खरेदी करता येत नव्हते. आता मात्र पेट्रोल पंपांवरून कोणत्याही प्रमाणात इंधन खरेदी करण्यास मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूक, उद्योग आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार असून इंधन पुरवठा सुरळीत होण्यासही मदत होणार आहे.
युरोपात भीषण उष्णतेनं हाहाकार
उष्णतेनं युरोपमध्ये 1300 जणांचा बळी
युरोपातील अनेक देश सध्या भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून गेल्या दहा दिवसांत 1,300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये सर्वाधिक सुमारे 1,000 मृत्यूंची नोंद झाली आहे. जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून दशकातील विक्रम मोडले आहेत. उष्णतेमुळे महामार्गावरील रस्ते वितळू लागल्याने काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, तर जंगलातील वणव्यांनीही भीषण रूप धारण केले आहे. जागतिक हवामान संघटनेनुसार, युरोप हा सर्वाधिक वेगाने तापमानवाढ अनुभवणारा खंड ठरत आहे. अल निनोचा प्रभाव आणि हवामान बदलामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
जर्मनीचं पॅकअप, पॅराग्वेचा दिमाखदार विजय
विश्वविजेत्या ब्राझिलला जपानची कडवी झुंज
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या जर्मनीला मोठा धक्का बसला असून पॅराग्वेने त्यांचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला. त्यात पॅराग्वेने सरस कामगिरी करत विजयी आगेकूच केली. दुसरीकडे, पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलने जपानचा 2-1 असा पराभव करून पुढील फेरी गाठली. मात्र जपानने संपूर्ण सामन्यात ब्राझीलला कडवी झुंज दिली आणि त्यांच्या भक्कम बचावफळीमुळे ब्राझीलला विजयासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. स्पर्धेतून बाहेर पडूनही जपानने आपल्या दमदार खेळाने फुटबॉलप्रेमींची मने जिंकली.
‘हे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत…’
राममंदिर देणगीचोरी प्रकरणी मुकेश खन्ना यांची संतप्त प्रतिक्रिया Top 10 News :
ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्यांनी मंदिरांमध्ये भक्तांनी दिलेली रोख देणगी देवापर्यंत पोहोचत नसून मध्येच गायब होत असल्याचा आरोप केला. “सगळीकडे लुटमार सुरू आहे. चोर, डाकू आणि बेईमान यांच्याही पलीकडचे लोक हे करत आहेत. हे केवळ भक्तांनाच नव्हे, तर देवालाही लुटत आहेत,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. पुढे त्यांनी भक्तांना मंदिरांमध्ये रोख रक्कम किंवा दागिने अर्पण करणे बंद करण्याचे आवाहन केले. “भक्तांनी देणगी देणे थांबवले, तर घोटाळ्यांनाही आळा बसेल आणि यातच देवाला आनंद होईल,” असंही मुकेश खन्ना यांनी म्हटलंय.





